नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : नागपूर जिल्ह्यात ६५ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरजिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. दुर्गम भागातील काही मतदान केंद्रावर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी ५.३० पर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेल्या आकडेवारीनुसार ६५ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होेते. विशेष म्हणजे अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. बुधवारी तालुकास्तरावर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.जिल्ह्यात ५८ जिल्हा परिषद सर्कलसाठी २७० उमेदवार व पंचायत समितीच्या ११६ गणांसाठी ४९७ उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात या निवडणुका होत असल्याने राजकीयदृष्ट्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. त्यामुळे ही निवडणुक त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, शिवसेना स्वतंत्र लढत आहे. सर्वच सर्कलमध्ये थेट भाजपाशीच लढत आहे. या निवडणुकीत मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार यांनी चांगलाच जोर लावला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा दावा या दोन्ही मंत्र्यांचा आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे स्वत: रिंगणात आहेत. माजी मंत्री रमेश बंग यांचेही पुत्र रिंगणात आहेत.