यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी
By Admin | Updated: May 3, 2016 03:38 IST2016-05-03T03:38:22+5:302016-05-03T03:38:22+5:30
प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत

यवतमाळच्या तरुणाची वीरूगिरी
नागपूर : प्रशासकीय बदली प्रक्रियेवर प्रचंड खर्च होतो. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. अशापरिस्थितीत प्रशासकीय बदल्यांना स्थगिती देऊन यावर होणारा खर्च राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात यावा, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळच्या एका तरुणाने नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून वीरूगिरी आंदोलन केले. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरविले.
श्रीधर आडे (३०) असे या आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव आहे. तो यवतमाळचा रहिवासी आहे. तो एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आझाद हिंद नावाचे एक क्रीडा मंडळ तो चालवितो. या माध्यमातून तो कबड्डी व अॅथ्लेटिक्सचे प्रशिक्षण देतो, तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही देतो. राज्यात सध्या दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. पाण्यासाठी लोकांचा बळी जात आहे. या परिस्थितीने श्रीधर आडेला व्यथित केले. यावर राज्यातील प्रशासकीय बदल्यांवर अब्जो रुपये खर्च होतात. तेव्हा चालू वर्षात अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि विशेष कारणांमुळे होणाऱ्या बदल्या वगळता इतर सर्व प्रकारच्या गटातील होऊ घातलेल्या बदल्यांना तत्काळ स्थगिती दिली तर बदली प्रक्रियेवर होणारा अब्जावधी रुपयांचा खर्च राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी वापरता येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासकीय बदल्या तातडीने स्थगित करून त्यावर होणारा खर्च दुष्काळ निवारण्यासाठी कामी आणावा, अशी मागणी करणारे निवेदन श्रीधरने २३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. तसेच १ मेपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास नागपुरात वीरूगिरी आंदोलन करण्याचा इशाराही त्याने दिला होता. शासनाने त्याच्या या निवेदनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. १ मेपर्यंत त्याला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे श्रीधर सोमवारी सकाळीच नागपुरात आला. त्याने वीरूगिरी आंदोलन करण्याचे अगोदरच पक्के केले होते.