देशाच्या सर्वांत वाईट काळातील, सर्वांत वाईट अर्थसंकल्प : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:05+5:302021-02-05T04:52:05+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात जाहीर केलेले दहा लाख कोटींचे पॅकेज कुठे ...

देशाच्या सर्वांत वाईट काळातील, सर्वांत वाईट अर्थसंकल्प : जयंत पाटील
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात जाहीर केलेले दहा लाख कोटींचे पॅकेज कुठे गेले, हे जसे कोणालाच कळले नाही तसेच या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या रकमा कुठे गेल्या हेही कोणालाच कळणार नाही, असा चिमटाही पाटील यांनी घेतला आहे. हा अर्थसंकल्प विशिष्ट उद्योगपतींसाठी आहे यात शंका नाही, असा थेट हल्ला त्यांनी सरकारवर केला. महाराष्ट्रासाठी देखील या अर्थसंकल्पात काहीच नाही. नागपूर, नाशिक व पुण्याच्या मेट्रोसाठी केलेली तरतूद नाममात्र आहे. याउलट पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आल्याने तिथे रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी भरपूर पैसे देण्यात आलेले आहेत. आमच्याही राज्यात रस्ते खराब आहेत. भारत सरकारचा पैसा वापरून भाजपाला पश्चिम बंगालमधील निवडणुका जिंकायच्या आहेत असे दिसते, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
कॉर्पोरेट क्षेत्राला १ लाख ४५ हजार कोटींची मदत मोदी सरकारने दिली आहे. करांच्या पद्धतीत देखील कोणतेही आमूलाग्र बदल करण्यात आलेले नाहीत. अर्थसंकल्पात संरक्षणावर किती मदत देणार हे अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही. बेरोजगारी कशी कमी करणार, महागाई नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. महागाईचे दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरले असल्याची टीका त्यांनी केली.