नागपुरात वेदनांना कंटाळून महिलेचा आत्मघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:43 PM2020-07-28T23:43:12+5:302020-07-28T23:44:30+5:30
डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाली आकाश देशभ्रतार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. ती वाठोडा मार्गावरील न्यू पँथर नगर झोपडपट्टीत राहत होती. तिला डोकेदुखी आणि अन्य एक व्याधी होती. त्यामुळे तिला असह्य वेदना व्हायच्या. वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करूनही तिला लाभ होत नव्हता. त्यामुळे ती वेदनांना कंटाळली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान बाली देशभ्रतार हिने स्कार्फने स्वत:चा गळा आवळला. ती बेशुद्ध अवस्थेत पडून दिसल्याचे तिला बाजूच्या खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला डॉक्टरांनी मेडिकलमध्ये नेण्याची सूचना केली. मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाली देशभ्रतारचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. बालीचे पती खासगी कंपनीत नोकरीला आहे. घरची स्थिती बऱ्यापैकी आहे. मात्र वेदनांनी तिला जीव नकोसा झाला होता. त्यामुळेच तिने आत्मघात करून घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.