नागपूर : मागील काही काळापासून शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील महावितरण, महापारेषणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या बैठकीत इतर लोकप्रतिनिधींनीदेखील तक्रारींचा पाढा वाचला, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता तरी महावितरणचा कारभार सुरळीत होईल का हा सवाल कायम आहे.
नागपुरात झालेल्या आढावा बैठकीत नेत्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ऐन उकाड्यात रात्रीच्या वेळी वीज बंद होत असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे, याकडे आमदारांनी लक्ष वेधले. यावेळी बैठकीला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्यांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने फडणवीस आणि गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन नेमक्या येत असलेल्या समस्या त्यात मांडाव्यात. समस्या तात्काळ सोडवून वीजपुरवठा देण्याचे स्पष्ट आदेश दिले.