कॉंग्रेस-भाजपच्या ‘हात’मिळवणीत विजय कुणाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:29+5:302020-11-28T04:11:29+5:30
अभय लांजेवार उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड ...

कॉंग्रेस-भाजपच्या ‘हात’मिळवणीत विजय कुणाचा?
अभय लांजेवार
उमरेड : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी झाली. दुसरीकडे उमरेड नगर पालिकेत भलतेच चित्र समोर आले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. कॉंग्रेस-भाजपच्या या ‘हात’मिळवणीत विजय नेमका कोणत्या पक्षाचा झाला, यावर आता चर्चा रुंगू लागल्या आहेत.
उमरेड पालिकेत भाजपची सत्ता आहे. उमरेडकरांनी २५ पैकी १९ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. नगराध्यक्ष म्हणून विजयलक्ष्मी भदोरिया यांना पसंती दिली. दुसरीकडे कॉंग्रेसला केवळ ६ जागेवरच करिश्मा दाखविता आला. या आकडेवारीवरून उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण १९ नगरसेवक एकजूट दाखवतील आणि उपाध्यक्ष ठरवतील, असे सर्वांनाच वाटले. झाले भलतेच. गंगाधर फलके आणि अरूणा हजारे हे दोन नगरसेवक एकमेकांविरूद्ध उभे ठाकले. भाजप विरुद्ध भाजप अशा लढाईत कॉंग्रेसने ‘हात’मिळवणी केली. भाजपाच्या एका गटाला संपूर्ण सहा मते बहाल केली आणि विजय आमचा झाला अशा तोऱ्यात फटाके फोडले.
साधारणत: वर्षभरानंतर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहे. अशावेळी एकमेकांना पाण्यात पाहण्याचे राजकारण या निवडणुकीतून समोर आले आहे. याचे पडसाद येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येतील, लाभ कोणत्या पक्षाच्या पदरात पडेल हे आत्ताच सांगता येणार नाही.
एकजूट राखण्यात अपयश
माजी आमदार सुधीर पारवे, आनंद राऊत, कृऊबासचे सभापती रूपचंद कडू, शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, गटनेता डॉ. मुकेश मुदगल अशी नेत्यांची फौज भाजपात आहे. नियोजनबद्ध काम असताना आणि एकतर्फी लढाई असताना नगरसेवकांमध्ये एकजूट राखण्यात भाजप का अयशस्वी ठरली, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.
कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
कॉंग्रेसने सुरेश चिचमलकर याला उपाध्यक्षपदाच्या मैदानात उतरविल्यानंतर चिचमलकरसह सारेच मते भाजपच्या पारड्यात गेली. यामागे नेमके कोणते गणित होते, असा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत मतदाता माजी मंत्री राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, शहर अध्यक्ष सुरेश पौनीकर आदींना विचारल्याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर विजय नेमका भाजपचा झाला की कॉंग्रेसचा या प्रश्नावर ‘विनोद’ निर्मिती होत आहे.