विशेष परीक्षेचा भुर्दंड कोण भरणार?

By Admin | Updated: August 14, 2014 01:21 IST2014-08-14T01:21:47+5:302014-08-14T01:21:47+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला

Who will fill the special examination land? | विशेष परीक्षेचा भुर्दंड कोण भरणार?

विशेष परीक्षेचा भुर्दंड कोण भरणार?

नागपूर विद्यापीठ : दोषी महाविद्यालयांबाबत प्रशासनाचे मौन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला मान्यता देण्यात आली अन् त्याची तयारी सुरू झाली. परंतु संबंधित परीक्षेसाठी होणारा खर्च हा विद्यापीठाच्या तिजोरीतून होणार आहे. महाविद्यालयांच्या चुकीमुळे संबंधित परीक्षा घेण्याची वेळ आली असताना त्यांच्याकडूनच याचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. संबंधित मुद्यावर विद्यापीठाने मौन साधले आहे.
राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु विद्यापीठाला सर्व जिल्ह्यांत ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांचा खर्च, वाहतूक खर्च, मनुष्यबळ याचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय कला, विज्ञान व वाणिज्य शाखा मिळून निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या यात परीक्षा घेतल्या जाणार आहे.
त्यांच्यासाठी परीक्षा ‘मॉडरेशन’ पासून ते उत्तरपत्रिका, मूल्यांकन, निकाल जाहीर करणे इत्यादी प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. याशिवाय, परीक्षा विभागावर अगोदरच उन्हाळी परीक्षांच्या निकालाचे ओझे आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबून काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा मोबदला इत्यादींसाठी विद्यापीठाच्याच तिजोरीतून पैसे खर्च होणार आहेत.
संबंधित परीक्षा ही प्रवेशबंदी घातलेल्या महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे उद्भवली आहे. अशा स्थितीत या महाविद्यालयांकडूनच विद्यापीठाने परीक्षेचा खर्च का वसूल करू नये, असा प्रश्न नाव न घेण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचा नामांकन नोंदणी क्रमांक नसतानादेखील त्यांच्या नावावर समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून शिष्यवृत्ती उचलली असल्याची तक्रार समाजकल्याण विभागाला प्राप्त झाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Who will fill the special examination land?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.