मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:27+5:302021-09-12T04:12:27+5:30

नागपूर : कोरोनाचे रुग्ण ज्या ग्रामपंचायतीत कमी झाले. तेथे ८ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. ...

Who will be responsible for children's health? | मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

मुलांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण?

नागपूर : कोरोनाचे रुग्ण ज्या ग्रामपंचायतीत कमी झाले. तेथे ८ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. नागपूर जिल्ह्यात १५ जुलैपासून ८ ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या; पण त्यासाठी शाळांना ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागली. मात्र, अनेक ग्रामपंचायतींनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने जिल्ह्यात अजूनही ४० टक्के शाळा सुरू होऊ शकल्या नाही.

- जिल्ह्यात ४० टक्के शाळा अजूनही बंद

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या असल्या, तरी शहरी भागातील शाळा अजूनही बंद आहेत. जिल्ह्यात एकूण ४१११ शाळा आहेत. यातील ग्रामीण भागात २५५८ शाळा आहेत. यात सर्वाधिक शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७७३ शाळा या ८ ते १२ वर्गाच्या आहेत. यातील ४३४ शाळा या सुरू झाल्या आहेत. जवळपास ४० टक्के विद्यार्थी दररोज उपस्थित राहत आहेत.

- दृष्टिक्षेपात

ग्रामीण भागात ८ ते १२ च्या एकूण शाळा - ७७३

सुरू झालेल्या शाळा - ४३४

एकूण विद्यार्थी - ६८२९१

उपस्थित विद्यार्थी - २६३८३

- सॅनिटायझेशन करा, पैसे कोण देणार?

ग्रामीण भागात ज्या शाळा सुरू होऊ शकल्या नाही, त्यातील बहुतांश शाळा या कायम विना अनुदानित तत्त्वाच्या आहेत. या शाळांचा मुख्य स्रोत विद्यार्थ्यांकडून येणारी फी आहे; पण कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरली नाही. दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मेंटनन्सचा खर्च आहे. शासनाच्या गाइडलाइनमध्ये शाळा सुरू करताना व केल्यानंतरच्या दिलेल्या नियमांनुसार दररोज सॅनिटायझेशन करायचे आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करायच्या आहेत. अशात विना अनुदानित शाळांना कुठलाही निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही.

- शाळा न सुरू होण्याची कारणे

१) पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद

२) ग्रामपंचायत जबाबदारी घ्यायला तयार नाही

३) शाळांच्या मेंटेनन्सवर लागणारा खर्च

४) शाळा सुरू केल्यानंतर लागणारा खर्च

५) पालकांकडून फीच्या संदर्भात अपेक्षित प्रतिसाद नाही

६) शिक्षकांच्या वेतनाचे प्रश्न

- शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहे; परंतु त्यासाठी काही नियमावलीसुद्धा दिली आहे. शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करा, असे लेखी पत्र नाहीत. पालकांचाही शाळा सुरू करण्याला अपेक्षित प्रतिसाद नाही. ग्रामपंचायत जेव्हापर्यंत पूर्ण पालकांचे संमतीपत्र येत नाही, तोपर्यंत परवानगी द्यायला तयार नाही.

-निशांत नारनवरे, शाळा संचालक

- नियमानुसारच शाळा सुरू करा

शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू करायच्या आहे; परंतु त्यासाठी ज्या नियमावली दिल्या आहे. त्या पूर्ण केल्यानंतरच शाळा सुरू करायची आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांना ग्रामपंचायतीनेच परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्या शाळा सुरू होऊ शकल्या नाही; परंतु त्यांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Who will be responsible for children's health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.