लोककल्याण नगरचे मनपा कधी करणार ‘कल्याण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST2021-03-07T04:07:40+5:302021-03-07T04:07:40+5:30

- विकासकामांचा याच भागात पडलाय खड्डा - मुरुम, गिट्टीवर पाच वर्षांपासून डांबरच नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर ...

When will the Municipal Corporation of Lokkalyan Nagar do 'Kalyan'? | लोककल्याण नगरचे मनपा कधी करणार ‘कल्याण’

लोककल्याण नगरचे मनपा कधी करणार ‘कल्याण’

- विकासकामांचा याच भागात पडलाय खड्डा

- मुरुम, गिट्टीवर पाच वर्षांपासून डांबरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहर विकासाच्या मार्गावर झपाट्याने पुढे जात आहे. सिमेंटचे रस्ते, उद्याने, मेट्रो, उड्डाणपुलांनी शहराची रयाच बदलली आहे. मात्र, विकासाच्या वाटेवर असलेल्या याच शहरात असे अनेक भाग आहेत, जिथे प्राथमिक नागरी सुविधांचा अभाव अजूनही दिसून येतो. पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६मध्ये येणाऱ्या वाठोडा येथील लोककल्याण नगरमध्ये या सुविधांचा असाच अभाव दिसून येतो. वस्ती वसली तेव्हापासून येथे रस्ते झालेले नाहीत. पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या तोंडावर आमदार निधीतून पायवाटांवर मुरुम-गिट्टी टाकण्यात आली होती. निवडणूक आटोपताच लोकप्रतिनिधींना त्यावर डांबरही टाकावे लागते, याचा विसर पडला. नागरिकांनी त्यावरूनच पुन्हा पायवाट शोधत आपला पारंपरिक रस्ताच तयार केला. एका अर्थाने नगराचे नाव लोककल्याण आहे, मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे या भागाचे कल्याण आजपावेतो झालेले नाही. येथील नागरिक आमदार, नगरसेवक, मनपा आयुक्तांकडे विकासाकामे करण्याबाबत वारंवार निवेदने देत आहेत. मात्र, मनपा अधिकारी-कर्मचारी येतात, भेट देतात, लवकरच कामे होतील, अशी आश्वासने देतात आणि निघून जातात. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता कधीही होत नाही, असेच चित्र लोककल्याण नगरमध्ये आहे. येथून नजिकच असलेल्या साईबाबा नगरची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. येथे रस्ते आहेत, परंतु नळाला पाणी नाही. गटारे उघडी सताड पडली असून, त्याचाच धोका मोठा आहे.

वीज कधीच नियमित नसते

लोककल्याण नगरमध्ये वीज कधीही नियमित नसते. दररोज दोन-तीनवेळा वीज जाते. परिसरात कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनमध्ये सतत बिघाड होत असतात. याविषयी महावितरणला सांगितले असता, तेही येतात आणि जुजबी दुरुस्ती करण्याचे आश्वासन देऊन निघून जातात, अशी स्थिती आहे.

घराला लागूनच विद्युत संयंत्र ()

येथे वस्ती बनण्यापूर्वी विद्युत संयंत्र अर्थात डीपी लावण्यात आली होती. मात्र, हे संयंत्र भविष्याचा विचार करून उभारण्यात आलेले दिसत नाही. कालांतराने नागरिकांनी प्लॉट खरेदी केले. संयंत्र हटविण्याची मागणी केली. मात्र, डीपी हटविण्यासाठी तुम्ही निधी द्या, अशी मागणी विद्युत मंडळाकडून केली जाते. आजतागायत अशा दोन ते तीन ठिकाणी हे संयंत्र अगदी घराला लागून उभे असल्याचे दिसून येते. त्यामुळे, कधीही मोठा अपघात होण्याची भीती आहे.

चहुबाजूंनी रस्ते अन् मध्येच खड्डा

सिम्बॉयसिस विद्यापीठासारख्या परिसरात असणाऱ्या या लोककल्याण नगरच्या आजूबाजूला विकासाचा झंजावात सुरू आहे. सिमेंटचे रस्ते, डांबरी रस्ते सर्वत्र झाले आहेत. मात्र, लोककल्याण नगरचाच एक भाग रस्ते विकासापासून दूर आहे. हा भाग अवैध असल्याचे आमदार सांगत असल्याचे नागरिक म्हणतात. मात्र, प्लॉटची नोंदणी झाली तेव्हा प्रशासन झोपेत होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखल तुडवत नागरिकांना जावे लागते, हे विशेष.

गटाराचे तुटलेले झाकण कधीच दुरुस्त झाले नाही

साईबाबा नगरात फुलवानी यांच्या घराच्या अगदी मागे असलेल्या दोन गटारांचे झाकण वर्षभरापासून तुटले आहे. त्याबाबत मनपाकडे निवेदनही देण्यात आले. याठिकाणी कर्मचारी येतात, बघून जातात. मात्र, दुरुस्तीचे काम अथवा नवे झाकण बसविण्यात आलेले नाही. एखादा लहान मुलगा खेळता-खेळता या गटारात पडल्यावरच मनपाला जाग येईल का, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

पाण्यासाठी ड्रम रस्तोरस्ती

नळाची लाईन आहे. मात्र, नळाला करंगळीपेक्षाही कमी धार असते. उन्हाळ्यात तर पाण्याची मोठी समस्या असते. त्यामुळे पाण्याचे टँकर मागवावे लागतात. त्यासाठी रस्तोरस्ती ड्रम ठेवण्यात आल्याचे चित्र येथे आहे.

----------

नागरिकांच्या प्रतिक्रिया

आमदार म्हणतात, ले-आऊट अनधिकृत

या भागाचे आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडे रस्त्याची मागणी करायला गेलो असता, ते हा भाग अनधिकृत असल्याचे सांगतात. मात्र, चार वर्षांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनीच येथे मुरुम, गिट्टी टाकली होती. मतांसाठी सर्व वैध आणि कामासाठी अवैध, अशी त्यांची दृष्टी झालेली आहे.

- गणेश हरकंडे, नागरिक (३८३७)

घर बांधताना मला विचारले होते का?

हा भाग अवैध आहे. घर बांधताना मला विचारले होते का, असा प्रश्न आमदार महोदय आम्हाला करतात. या भागात आमदार साहेब कधीच आलेले नाहीत. नगरसेवकांचे तोंडही गेल्या दोन वर्षांत कधीही पाहिले नाही. केवळ मतांसाठी ते येतात. पाच वर्षांपासून रस्त्यावर डांबरच पडले नाही.

- राजकुमार हजारे, नागरिक (३८३८)

पाणी निकासीसाठी गडरलाईन नाही

- अनेक समस्या आहेत. रस्ते तर नाहीतच. गडरलाईनही नाही. वेस्टेज वॉटर लाईन टाकली आहे. मात्र, ती व्यवस्थित नसल्याने पाणी बाहेरच येते. साफसफाईसाठी कोणताच कर्मचारी कधीच येत नाही. कचरा गाडी मनाला वाटेल तेव्हा येते.

- पार्वताबाई रोडे, नागरिक (३८३९)

गेल्या दिवाळीपासून गटाराची दुरुस्ती नाही

गेल्या दिवाळीपूर्वी घराच्या मागे असलेल्या दोन्ही गटारांचे झाकण तुटले. तेथून प्रचंड वास येतो. तक्रार केली असता, कर्मचारी येतात आणि निघून जातात. आता पुढच्या दिवाळीपर्यंत तरी ते झाकण लावले जाईल, अशी अपेक्षा आहे.

- देवकी फुलवानी, नागरिक (३८६६)

पावसाळ्यात शाळकरी मुले घसरून पडतात

रस्ते नसल्याने पावसाळ्यात येथे प्रचंड चिखल असतो. पावसाचे पाणी घरात शिरते. शाळेत जाताना मुले घसरून पडतात. बरेचदा मुलांची पुस्तके चिखलात ओली झाली आहेत. रस्ते बनतील, हे आता आमच्यासाठी स्वप्नच आहे.

- अनिता समरीतकर, नागरिक (३८७२)

मुलांसाठी एकही मैदान नाही

लोककल्याण नगरातील मुलांसाठी खेळण्याचे एकही मैदान नाही. लेआऊट टाकणाऱ्याने ही बाब विचारात घेतलेली नाही. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी लोकप्रतिनिधी आमचा परिसर अवैध असल्याचे सांगतात. मग, आमच्या रजिस्ट्री ज्यांनी केल्या ते वैध नाहीत का, असा प्रश्न विचारावासा वाटतो.

- कल्पना तरोणे, नागरिक (३८९०)

..................

Web Title: When will the Municipal Corporation of Lokkalyan Nagar do 'Kalyan'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.