महाराष्ट्राचा वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:10+5:302021-03-04T04:11:10+5:30
निशांत वानखेडे नागपूर : वन्यजीव संवर्धन व संरक्षणाबाबत गेल्या काही वर्षांत जागृती वाढली आहे व त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत ...

महाराष्ट्राचा वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन कधी?
निशांत वानखेडे
नागपूर : वन्यजीव संवर्धन व संरक्षणाबाबत गेल्या काही वर्षांत जागृती वाढली आहे व त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत वाघांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे आणि त्यातही महाराष्ट्र अग्रणी आहे. मात्र ही जागृती बऱ्याचअंशी व्याघ्रकेंद्रित असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील जंगलांमध्ये १००० वर प्रजातींचा अधिवास आहे व त्यातील काही विलुप्त हाेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यात स्वतंत्र वन्यजीव धाेरण तयार करणे किंवा केंद्राच्या धर्तीवर वन्यजीव कृती याेजना राबविणे नितांत गरजेचे असल्याचे मत वन्यजीव तज्ज्ञांद्वारे व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही महिन्यात विविध शहरांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर त्याकडे धाेरणकर्त्यांचे लक्ष गेले व त्यावर उपाययाेजना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. त्याचप्रमाणे विलुप्त हाेत चाललेल्या खवले मांजर व माळढोक पक्ष्याच्या अधिवास विकासाचे काम सुरू आहे. तनमोर, रानम्हशी यांच्याबाबतही कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र एखादा मुद्दा गाजल्यावरच हालचाली केल्या जातात. ताेपर्यंत एखादी प्रजाती नामशेष हाेण्याच्या मार्गावर पाेहचली असते. त्यामुळे महाराष्ट्राचे स्वतंत्र वन्यजीव धाेरण राबविले जावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. चंद्रपूरचे मानद वन्यजीव संरक्षक बंडू धाेत्रे यांनी सांगितले की, राज्याचे स्वतंत्र धाेरण असावे म्हणून पाच वर्षांपूर्वीच प्रस्ताव देण्यात आला हाेता. मात्र त्यावर अद्याप कार्य झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्र शासनातर्फे दर १५ वर्षांसाठी वन्यजीव कृती कार्यक्रम राबविला जाताे. तशाप्रकारचा कृती कार्यक्रम राज्यातही राबविण्याचे मत प्रधान मुख्य वनसंरक्षक-वन्यजीव नितीन काकोडकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धनासाेबत पर्यटन विकास आणि वनक्षेत्रालगतच्या नागरिकांसाठी राेजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे नियाेजन करता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देशात १०३ राष्ट्रीय उद्याने, ५३७ वन्यजीव अभयारण्य मिळून ७३३ संरक्षित वनक्षेत्र आहेत, जे १,६०,९०१.७७ चाैरस किलाेमीटरमध्ये पसरले आहे.
काय आहे केंद्रीय वन्यजीव कृती कार्यक्रम
- केंद्रीय वन्यजीव कृती कार्यक्रम दर १५ वर्षांसाठी राबविला जाताे. १९८३ मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली हाेती.
- पहिला १९८३ ते २००१, दुसरा २००२ ते २०१६ व आता तिसरा २०१७ ते २०३१ पर्यंत चालणार आहे.
- नामशेष हाेण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन
- वन्यजीवांची शिकार व तस्करीवर नियंत्रण
- मनुष्यबळ विकास व वन उपजीविका वाढविण्यासाठी नियाेजन
- संशाेधन व निरीक्षणाला बळकटी देणे.
उपजीविका सक्षम करण्याचे प्रयत्न
नितीन काकाेडकर यांनी सांगितले, विविध संघटनांच्या मदतीने वनविभागातर्फे वन उपजीविका सक्षम करण्यासाठी ड्रायव्हिंग, हाॅस्पिटॅलिटी, मोटार मेकॅनिक्स, टेलरिंग, संगणक हाताळणे, लाखेचे वस्तू बनविणे याचे सर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच पाणस्थळांची निर्मिती, तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण विकासाची कामे करण्यात मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे त्यांनी सांगितले.
विलुप्त हाेणाऱ्या विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी वनविभाग सक्रिय आहे. मात्र केंद्राच्या धर्तीवर राज्यात वन्यजीव कृती कार्यक्रम राबविण्याची तयारी चालली आहे. यासाठी लवकरच वन्यजीव मंडळाच्या सदस्यांची बैठक बाेलावून राेडमॅप तयार करण्यात येणार आहे.
- नितीन काकाेडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक-वन्यजीव, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्राचे स्वतंत्र वन्यजीव धाेरण असायला हवे. यामुळे वाघासह सर्वच वन्यजीवाच्या संवधर्न व संरक्षणाबाबत स्वतंत्रपणे काम करता येईल. वन्यजीवांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यात येतील व स्पष्ट धाेरणानुसार प्रत्येक व्यक्तीचे कार्य ठरेल.
- बंडू धाेत्रे, मानद वन्यजीव संरक्षण