शहीद भगतसिंगांचा पुतळा कधी?
By Admin | Updated: August 9, 2014 02:28 IST2014-08-09T02:28:30+5:302014-08-09T02:28:30+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकून इंग्रज राजवटीला हादरविणारे, देशासाठी हसतहसत फासावर जाणारे, महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा नागपूरच्या प्रशासनाला विसर पडला आहे.

शहीद भगतसिंगांचा पुतळा कधी?
मंगेश व्यवहारे नागपूर
स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकून इंग्रज राजवटीला हादरविणारे, देशासाठी हसतहसत फासावर जाणारे, महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा नागपूरच्या प्रशासनाला विसर पडला आहे. प्रशासनाने भगतसिंगच्या पुतळ्यासाठी जागा देण्यास इन्कार केल्याने, घंटानादचे संस्थापक बाबा शेळके यांनी घरातच पुतळ्याची स्थापना केली आहे.
युवकांनी भगतसिंगच्या शौर्याची प्रेरणा घ्यावी, या भावनेतून ‘घंटानाद’ चे संस्थापक बाबा शेळके यांनी विजय टॉकीज जवळील शहीद भगतसिंग चौकात पुतळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २००६ पासून त्यांनी पुतळ्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. पुतळ्याच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या विभागाची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही विभागाने उत्तर दिले नाही. त्यामुळे २३ मार्च २००७ रोजी प्रशासनाला न जुमानता भगतसिंग यांचा पुतळा स्थापण्याचा निर्णय घेतला. ६४००० रुपये खर्च करून त्यांनी भगतसिंग यांच्या पुतळ्याची निर्मिती केली. त्यासाठी विजय टॉकीजच्या चौकात चबुतरा बांधला. पुतळ्याच्या स्थापनेसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विलास मुत्तेमवार, आमदार दीनानाथ पडोळे, भगतसिंग यांचे सहकारी काकासाहेब पापरीकर, रामकृष्णदादा बेलूरकर बोलाविले. मात्र ऐन कार्यक्रमात गणेशपेठ पोलिसांनी एक नोटीस बजावून पुतळ्याच्या स्थापनेला विरोध केला. त्यामुळे हा कार्यक्रम खंडित झाला. त्यानंतर बाबा शेळके यांनी पालकमंत्री, नगरविकास मंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, महापौर, यांना वारंवार निवेदन, धरणे आंदोलन केले. मात्र कुणीच दखल घेतली नाही. शेवटी शेळके यांनी आपल्या घरातच भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्थापना केली. आता भगतसिंग यांच्या जयंतीला, पुण्यतिथीला, स्वातंत्र्यदिनाला आणि गणराज्य दिनाला ते घरीच कार्यक्रम करतात. प्रशासन नियोजित स्थितीत जोपर्यंत हा पुतळा बसवित नाही, तोपर्यंत त्यांचा संघर्ष सुरू राहणार आहे.