दोषींवर कारवाई कधी?
By Admin | Updated: September 6, 2016 02:29 IST2016-09-06T02:29:53+5:302016-09-06T02:29:53+5:30
गौरी पूजेसाठी गेलेल्या पाच विद्यार्थिनी आणि एका महिलेचा बंधाऱ्यातील खोल खड्ड्यात बुडून मृत्यू

दोषींवर कारवाई कधी?
सावंगीतील मृत्यूप्रकरण : समिती करणार चौकशी
हिंगणा : गौरी पूजेसाठी गेलेल्या पाच विद्यार्थिनी आणि एका महिलेचा बंधाऱ्यातील खोल खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा तालुक्यातील सावंगी (देवळी) शिवारात रविवारी सकाळी घडली. या सहाही जणींच्या मृत्यूस खड्डा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील अभियंता हे या घटनेस सर्वस्वी जबाबदार असल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट होते. मात्र अद्याप एकाही दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. किंंबहुना; हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचेही औदार्य प्रशासनाच्या वतीने कुणीही दाखविले नाही.
सावंगी (देवळी) शिवारात नाल्यावर मे २०१५ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्यावतीने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने कंत्राटदार सावरकर याने नाल्याच्या पात्रात खोल खड्डा खोदला आणि त्यातील पाण्याचा वापर बांधकामासाठी केला. बांधकाम पूर्ण होताच हा खड्डा बुजविणे क्रमप्राप्त होते. नाल्याच्या पात्रात खोल खड्डा खोदण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तसेच जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातील अभियंत्यांना होती. कुणीही हा खड्डा बुजविण्यासंदर्भात कंत्राटदाराला सूचना केली नाही किंवा त्याने हा खड्डा न बुजविल्याने त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही.
परिणामी, या नाल्यावर गौरी पूजनासाठी गेलेल्या जान्हवी ईश्वर चौधरी (१३), प्रिया रामप्रसाद राऊत (१८), पूजा रतन डडमल (१७), पूनम तुळशीराम डडमल (१८) आणि प्रणिता शंकर चामलाटे (१७) व मंदा नत्थूजी नागोसे (५५) सर्व रा. सावंगी (देवळी) ता. हिंगणा या सहा जणींचा या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मंदा नागोसे या बुडत असलेल्या विद्यार्थिनींना वाचविण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे या खड्ड्याचा मुद्दा ऐरणीवर आला. दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी लगेच घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी संतप्त नागरिकांनी पालकमंत्री बावनकुळे यांना पाल्याच्या पात्रातील या खड्ड्याबाबत अवगत केले. नागरिकांच्या भावना लक्षात घेता या खड्ड्याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापना करण्याचे निर्देश दिले. या समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, महसूल, पंचायत व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची तसेच माजी मंत्री रमेश बंग यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची तात्पुरती आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही मदत मृतांच्या कुटुंबीयांकडे सोमवारी सकाळी सुपूर्द करण्यात आली.
या घटनेला कंत्राटदार व लघुसिंचन विभागातील अभियंता जबाबदार असल्याचा आरोप करीत काही नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्ह दाखल करण्याची मागणी केली. परंतु, प्रशासनाने या घटनेची चौकशी तसेच दोषींवर कारवाई करण्याबाबत प्रभावी पावले उचलली नाही.
या प्रकरणी प्रशासनाने पोलिसांना तक्रारही दाखल केली नाही. (प्रतिनिधी)
महेंद्र झाला पोरका
४महेंद्र हा मंदा नागोसे यांचा एकुलता एक मुलगा. मंदा नागोसे यांच्याकडे शेती नसल्याने त्या मजुरी करून उदरनिर्वाह करायच्या. महेंद्रचे वडील नत्थूजी नागोसे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे मंदाबार्इंनीच महेंद्रचे संगोपन केले. महेंद्र हा २८ वर्षांचा असून, अविवाहित आहे. तोदेखील मजुरी करून आईला हातभार लावायचा. महेंद्रचे यावर्षी लग्न करावयाचे असल्याचे मंदाबार्इंनी त्यांच्या शेजार व नातेवाईकांना सांगितले होते. या घटनेत विद्यार्थिनींना वाचविण्यासाठी धावलेल्या मंदाबार्इंचाही बुडून मृत्यू झाला. त्यामुळे महेंद्र पोरका झाला.
खोल पाण्यात जाणे टाळा
४या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी दुपारी तातडीची बैठक घेतली. ऋषिपंचमीनिमित्त (दि. ६) वेणा नदीच्या पात्रात शेकडो भाविक आंघोळ करण्यासाठी येतात. यात महिलांची संख्या अधिक असते. या बैठकीत सदर मुद्यावर चर्चा करण्यात आली. भाविकांनी नदीच्या पात्रात आंघोळ करताना खोल पाण्यात जाण्याचे टाळावे, असे आवाहन तहसीलदार वाघमारे यांनी केले. तसेच या नदीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याच्या सूचना केल्या.
मृतांवर अंत्यसंस्कार
४हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी रात्री ७ वाजेपर्यंत उत्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, उपविभागीय अधिकारी (महसूल) बाळासाहेब कोल्हेकर, तहसीलदार प्रताप वाघमारे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी रुग्णालयात हजर होते. त्यानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास या पार्थिवांवर सावंगी (देवळी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.