कौतिकराव ठाले-पाटील यांचे नागपूरचे दुखणे कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:35+5:302021-06-27T04:07:35+5:30

- महामंडळाच्या कारभाराचे नियोजन फसले : ‘उलट्या बोंबा’ ठाेकून काय साध्य केले? प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

What is the pain of Kautikrao Thale-Patil in Nagpur? | कौतिकराव ठाले-पाटील यांचे नागपूरचे दुखणे कोणते?

कौतिकराव ठाले-पाटील यांचे नागपूरचे दुखणे कोणते?

- महामंडळाच्या कारभाराचे नियोजन फसले : ‘उलट्या बोंबा’ ठाेकून काय साध्य केले?

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा वार्षिक अहवाल अंक ‘अक्षरयात्रा’च्या अध्यक्षीय सदरात महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आडोशाने अनेकांवर ताशेरे ओढले आहेत. नागपूरकर मंडळींना त्यांनी तर धारेवरच घेतले आहे. महामंडळ औरंगाबादला आल्यापासून नियोजनात सातत्याने आलेले अपयश आणि ओढवून घेतलेले अनेक वादंग, यातून आलेले नैराश्यच त्यांच्या या वक्तव्यांना कारणीभूत तर नाही ना असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहेेत.

त्यांच्या या अध्यक्षीय लेखात त्यांनी नाशिकमध्ये संमेलनासाठी जमवला जात असलेला धनाकोष, हे संमेलन दिल्लीला नेण्यासाठी आग्रही असलेले पुणेकर, ठाले-पाटील यांच्या धोरणांवर प्रखर आक्षेप घेणारे नागपूरकर, संजय नाहर, शरद पवार, छगन भुजबळ, महामंडळ नागपूरला असताना धोरणात केलेल्या सुधारणांवर व तत्कालीन महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर प्रचंड आगपाखड केली आहे. ठाले-पाटील यांचा नागपूरवर असलेला विशेष राग म्हणजे, तब्बल ५७ वर्षात प्रथमच महामंडळाच्या धोरणात केलेल्या सुधारणा होत. २०१६ ते २०१९ या काळात महामंडळाच्या परंपरेनुसार महामंडळाचे कार्यालय घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाकडे होते आणि डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्ष होते. या काळात अनेक जुन्या परंपरा मोडून काढत महामंडळाने अनेक सुधारणा केल्या होत्या. या सगळ्यांचा पै न पै हिशेब सादर करण्याची परंपराही नागपुरातून सुरू झाली. या सगळ्या सुधारणांसाठी जोशी यांनी अनेकांची नाराजीही ओढवून घेतली. मात्र, कालांतराने या सगळ्या सुधारणांना पारदर्शकता म्हणून नवी ओळखही मिळाली. मात्र, महामंडळ औरंगाबादला वळते होताच, अनेक सुधारणांना केराची टोपली दाखवण्याचे षडयंत्र झाले. त्यावर आलेल्या आक्षेपांकडे ठाले-पाटील यांनी कानाडोळा केला आणि एकहुकमी कारभार राबविण्याचे आरोपही त्यांच्यावर व्हायला लागले. त्यातून उस्मानाबाद (धाराशिव) येथे पार पडलेल्या ९३व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दीब्रिटो यांची निवड करून त्यांनी वाद ओढवून घेतले. दिल्ली येथे आग्रही असणाऱ्या पुणेकर संस्थेला नाकारत नाशिकला ९४वे संमेलन देऊ केले. यातून उफाळलेल्या वादाला नागपूर निर्मित अशी घोषणा करून ते मोकळेही झाले. त्यामुळे, कौतिकराव ठाले-पाटील यांचे नेमके दुखण कोणते म्हणण्यापेक्षा हे दुखणे नागपूरच होय, असे जवळजवळ स्पष्ट व्हायला लागले आहे. कदाचित नागपुरात महामंडळ असताना झालेल्या सुधारणा त्यांना नको होत्या का, हा प्रश्न आहे.

-------------

महामंडळाला नागपूरने लावलेल्या शिस्तीचे कौतुक कधी करणार?

महामंडळाचे कार्यालय नागपूरला येण्यापूर्वी ५७ वर्षात महामंडळाचा कारभार सैरभैर होता. सरकारकडून अनुदान घेणे आणि संमेलनासाठी निधी गोळा करून संमेलनाचे आलिशान आयोजन करणे, यावरच भर असे. मात्र, या सर्वांना वेसन घालण्याचे कार्य नागपुरात झाले. खर्च कपात, दर सहा महिन्याचे ऑडिट, संमेलनांवरील होणाऱ्या खर्चाला घातलेली वेसण, संमेलनात सहभागी होणाऱ्या मंडळींना स्वखर्च करण्यास भाग पाडणे, अध्यक्षपदाची निवडणूक कायमची रद्द करून सन्मानाने अध्यक्षांची निवड करणे, वार्षिक अधिवेशन व साहित्य संमेलन वेगळे घेणे आदी सुधारणा झाल्या. त्यामुळे, महामंडळातील आर्थिक व्यवहार सर्व जगाला कळायला लागले. नागपूरने लावलेल्या या शिस्तीचे कौतुक करण्याचे सोडून कौतिकराव ठाले-पाटील आक्षेपच घेत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत.

-----------

हा त्यांचा मोठ्ठा गेम प्लान

ठाले-पाटील यांना दुसऱ्यांवर आगपाखड करणे, मराठी अस्मितांचा अपमान करण्याचा छंदच आहे. सांगली संमेलनातील व्यासपीठावरून यशवंतराव चव्हाण यांचा अपमान करण्याप्रकरणी त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचेही प्रयत्न झाले. मात्र, त्यांच्या या कटकारस्थानाला सतीश देसाई बळी पडले होते. नाशिकचे संमेलन रद्द करण्याची भाषा करणे, मराठी अस्मितांचा अपमान करणे, आरोप करणे, उलट्या बोंबा ठोकून त्यांचा काही तरी मोठ्ठा गेम प्लास असण्याची शक्यता आहे.

- संजय नाहर, सरहद्द संस्था, पुणे

................

Web Title: What is the pain of Kautikrao Thale-Patil in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.