आमीर खानचा दोष काय?

By Admin | Updated: November 26, 2015 03:17 IST2015-11-26T03:17:38+5:302015-11-26T03:17:38+5:30

देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असताना ....

What is the fault of Aamir Khan? | आमीर खानचा दोष काय?

आमीर खानचा दोष काय?

मा.गो.वैद्य यांच्याकडून पाठराखण : संघ पदाधिकाऱ्यांचे मात्र मौन
नागपूर : देशात असहिष्णुता वाढल्यामुळे आपली पत्नी किरण देश सोडून जाण्याच्या विचारात असल्याच्या सुपरस्टार आमीर खान याच्या वक्तव्यामुळे रान पेटले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर मौन साधले आहे. परंतु दुसरीकडे संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी मात्र आमीर खानची पाठराखण केली आहे. संबंधित मत हे आमीर खानचे नव्हते, मग त्याला दोषी का ठरविण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
देशभरात आमीर खान समर्थक विरुद्ध विरोधक अशी बाजू तापली होती. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी नागपुरातच आमीर खानवर जोरदार टीका करत त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर संघाकडून याची काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता होती. परंतु संघ पदाधिकाऱ्यांनी याबाबत मौन राखले आहे.
मा.गो.वैद्य यांनी मात्र आमीर खानची बाजू उचलून धरली. मुळात या प्रकरणात आमीर खानचा दोष नाही. त्याच्या मनात देश सोडून जावे असे आलेले नाही. त्याच्या पत्नीच्या मनात असे विचार आले होते. त्याने त्याच्या पत्नीला याबाबत विचारणा करायला हवी. आपल्याहून अधिक सहिष्णुता असलेल्या देशाचे नाव त्याची पत्नी सांगू शकणार नाही, कारण भारतासारखा सहिष्णुता असलेला कुठलाही देश नाही, असे मत मा.गो.वैद्य यांनी व्यक्त केले. वैद्य यांच्या या भूमिकेवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ.मनमोहन वैद्य यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
लहान गोष्टीला मोठे करण्याची गरज नाही
देशात असहिष्णूतेच्या मुद्यावरून जो वाद सुरू आहे तो एका कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप मा.गो.वैद्य यांनी केला. देशात लहान गोष्टींना फार मोठे करण्यात येत आहे. असे करण्याची आवश्यकता नाही. साहित्यिकांनी एकत्र पुरस्कार परत केले नाही. तर बिहार निवडणूकीच्या काळात महिनाभर हा क्रम सुरू होता. यातूनच हे षड्यंत्र असल्याचे वाटत आहे. यात साहित्यिकांसोबतच चित्रपट कलाकारांचादेखील सहभाग आहे असे ते म्हणाले.

Web Title: What is the fault of Aamir Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.