बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:35+5:302021-05-25T04:08:35+5:30

शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व ...

What are the options for 12th standard exam? | बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेबाबत अजूनपर्यंत कुठलीही घोषणा केली नाही. कोरोनाच्या परिस्थितीमुळे व तिसऱ्या लाटेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या गेलेल्या अलर्टनुसार बारावीच्या परीक्षेबाबत साशंकताच आहे. बारावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने परीक्षा घेणे गरजेचे आहे. लोकमतने यासंदर्भात शहरातील शिक्षकांकडून मत जाणून घेतले. त्यांचे म्हणणे आहे की, बोर्डाने परीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. बोर्डाने ठरविल्यास परीक्षा परीक्षेचे नियोजन यशस्वी करता येऊ शकते.

राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेची तयारी एप्रिल महिन्यात केली होती. तारीख आणि टाइमटेबलही घोषित केला होता. पण एप्रिल महिन्यात राज्यात कोरोनाने चांगलाच कहर केला. सरकारला लॉकडाऊन लावावे लागले. अजूनही राज्यात लॉकडाऊन सुरूच आहे. त्यानंतर परीक्षेबाबत कुठलीही घोषणा झाली नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थी मात्र संभ्रमित झाला आहे. परीक्षेचेच काही नक्की नसल्याने अभ्यासापासून तो कंटाळला आहे. शहरातील काही तज्ज्ञ शिक्षकांचे मत आहे की, बारावीची परीक्षा बोर्डाला घ्यावीच लागेल. या शिक्षकांनी काही फाॅर्म्युलेही सुचविले आहेत.

- दृष्टिक्षेपात

बारावीच्या परीक्षेत नागपूर बोर्डातून प्रविष्ट झालेले विद्यार्थी - १,४६,९९१

- सरकार व बोर्ड जर परीक्षेचे आयोजन करीत असेल तर ५०-५० चा फाॅर्म्युला उत्तम आहे. या फाॅर्म्युल्यानुसार ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी व ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करावे. प्रश्नांच्या संख्येनुसार वेळ निर्धारित करावा. या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अधिक वेळ थांबावे लागणार नाही.

आशनारायण तिवारी, प्राचार्य, श्रीमती सी.बी.आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, गांधीबाग

- कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना सरकार जर निवडणुका घेऊ शकते, तर परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. उलट लॉकडाऊनच्या काळात परीक्षा यशस्वी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना, परीक्षेच्या कामातील शिक्षकांना विशेष पास देण्यात यावी. शाळाच सेंटर ठेवण्यात यावे. एकेका वर्गात २० विद्यार्थी झिगझॅग पद्धतीने नियोजन करावे. जिल्ह्यात शाळा भरपूर आहेत. परीक्षा यशस्वी होऊ शकतात.

प्रा. सपन नेहरोत्रा, शिक्षक तज्ज्ञ

- बारावीच्या परीक्षा बोर्डाने घेणे गरजेचे आहे, कारण बारावीनंतर अनेक स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्यांचे योग्य मूल्यमापन हा एक निकष असतो. प्रत्येक पेपरमध्ये तीन दिवसाचे अंतर ठेवल्यास विद्यार्थ्याला स्वत:ची हेल्थ मॉनिटरिंग ठेवता येईल व शाळांनादेखील निर्जंतुकीकरण करणे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी इतर पूर्वतयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल. त्याचप्रमाणे होम सेंटर दिल्यास एकाच ठिकाणी केंद्रावर गर्दी होणे ही बाबदेखील टाळता येईल.

डॉ. निशांत नारनवरे, संचालक, सेंट्रल प्रोव्हिन्शियल स्कूल

- काय म्हणतात विद्यार्थी...

- आम्ही विद्यार्थी खरंच कन्फ्युज आहोत. परीक्षेचा टाइमटेबल घोषित होतो, तारखा ठरतात, आम्ही अभ्यासाला लागतो आणि अचानक परीक्षा रद्द होतात. मग निराशा येते. एकदा परीक्षा घेऊन टाकलेली बरी. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरविता येते. बारावा वर्ग शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती करण्यास पसंतीनुसार शाखा निवडण्यास मदत होते.

रूपाली पटले, विद्यार्थिनी, ज्योतिबा ज्युनि. कॉलेज

- एकदा सरकारने निर्णय घेऊन मोकळे करावे. १४ महिने होत आहे. अभ्यासातला तोच तो पणा वाचूनही कळत नाही. अभ्यासापासून मन उडाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्डाने नियोजन करावे. शाळा भरपूर आहेत. १० ते १५ विद्यार्थ्यांचे एका वर्गात नियोजन करावे. आम्हीही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणारच आहोत.

पारुल राऊत, विद्यार्थिनी, ज्युपिटर ज्युनि. कॉलेज

Web Title: What are the options for 12th standard exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.