आम्हाला रात्री ९ पर्यंत राबावे लागते
By Admin | Updated: June 3, 2017 02:00 IST2017-06-03T02:00:59+5:302017-06-03T02:00:59+5:30
जनमंच संस्थेतर्फे जिल्हा परिषदेत कार्यालयीन वेळेत भेट देऊन कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या संदर्भात पोलखोल करण्यात आली.

आम्हाला रात्री ९ पर्यंत राबावे लागते
जनमंचने इकडेही लक्ष द्यावे : जि.प. कर्मचाऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनमंच संस्थेतर्फे जिल्हा परिषदेत कार्यालयीन वेळेत भेट देऊन कर्मचारी अनुपस्थित असल्याच्या संदर्भात पोलखोल करण्यात आली. कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात, वीज पंखे सुरू ठेवून बाहेर पडतात. अधिकारी आपल्या कक्षात नसतात, असे आक्षेप जनमंचतर्फे घेण्यात आले.
जनमंचने घेतलेल्या आक्षेपावर जि.प.च्या कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जि.प. असलेल्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वाढलेला अतिरिक्त कामाचा भार लक्षात घेता, अधिकारी-कर्मचाऱ्यांना रात्री ९ वाजेपर्यंत थांबावे लागते. सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागते, याकडेही जनमंचने लक्ष द्यावे, अशी मागणी नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे कामकाज लक्षात घेता १५ ते १६ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात ९ हजारावर कर्मचारी काम करीत आहे.
शासनाच्या योजना वाढल्या आहेत. त्यामुळे कामे वाढलेली आहे. एका एका कर्मचाऱ्याकडे दोन-तीन पदांचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत काम करावे लागते. सुट्यांच्या दिवसातही कामावर येऊन दिवसभर काम करावे लागते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयात कर्मचाऱ्यांना सेवा द्याव्या लागतात.
एकीकडे शासनाने नोकरभरती बंद केली आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे, देशाचे तरुण वाममार्गाला लागले आहे.
या समस्येवरही जनमंचने लक्ष द्यावे, असे मत महासंघाचे विलास बारापात्रे, संजय धोटे, एन.एल. सावरकर, विनोद टेंभुर्णे, अरविंद पावडे, मिथिलेश देशमुख, राजेंद्र गंगोत्री, नरेश इटनकर, अनिल बालपांडे, सत्येंद्र अत्रे, उज्वल सज्जनवार, वैभव तांबेकर, शैलेश ढाकणे, भालचंद्र जावतकर, अनिल मोहगावकर, गुणवंत वाघ आदींनी व्यक्त केले आहे.