गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णाच्या खोऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST2021-02-05T04:52:41+5:302021-02-05T04:52:41+5:30
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : भाग १ गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा-नळगंगा ...

गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून पाणी पोहोचणार तापी-पूर्णाच्या खोऱ्यात
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : भाग १
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पूर्व विदर्भातील गोदावरी-वैनगंगेच्या खोऱ्यातून अतिरिक्त पाणी घेऊन ते पश्चिम विदर्भातील तापी-पूर्णाच्या खोऱ्यात वळविण्याचा हा प्रकल्प आहे. प्रकल्पाचा डीपीआर तीन वर्षांपासून तयार असून, आता केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा आहे.
केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय जल मंत्रालयाने १९८० मध्ये देशात नदीजोड प्रकल्प आखला. त्यानंतर १७ जुलै १९८२ मध्ये नदीजोड प्रकल्पाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय जल विकास अभिकरणाची स्थापना केली. पुढे २००९ मध्ये राज्य सरकारने राज्यातील तीन नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव अभिकरणाकडे पाठविले. त्यापैकी विदर्भातील वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प मान्य करण्यात आला. पूर्व विदर्भातील वैनगंगा (नागपूर-भंडारा) ते पश्चिम विदर्भातील नळगंगा (जि. बुलडाणा), असा ४२६.५४२ किलोमीटर लांबीचा हा नदीजोड प्रकल्प आहे. अर्थात पूर्वेचे पाणी पश्चिमेचा प्रवास करून विदर्भातील शेतकऱ्यांची हिरवी स्वप्ने साकारणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यांतील ३ लाख ७१ हजार २७७ हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार असल्याने विदभार्साठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
या प्रकल्पाचे आयुर्मान १०० वर्षे राहील, असे प्रकल्प अहवालात नमूद आहे. ६ जिल्ह्यांतील १५ तालुक्यांना याचा लाभ होणार असून, २०५० पर्यंत ११ कोटी ३३ लाख नागरिकांना लाभ मिळण्याचे प्रस्तावित आहे. पाण्याच्या प्रवास मार्गातील लगतच्या एमआयडीसीला पाणी मिळणार असून, ओपन कॅनलच्या ठिकाणी असणाऱ्या लिंकेजमधून १,८८४ मे. व्हॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्याचीही योजना आहे.
...
नळगंगेत पोहोचणार ३७.५८ द.ल.घ.मी. पाणी
या योजनेसाठी गोसे खुर्द प्रकल्पातून १,७७२ द.ल.घ.मी. पाणी उचलले जाणार आहे. ते लोअर वर्धा, काटेपूर्णा या प्रकल्पामधून मार्गातील ३९ तलावांमधून खेळवत ४२६.५४२ किलोमीटर प्रवास करीत हे पाणी नळगंगा प्रकल्पात पोहोचविण्याची योजना आहे. सिंचन, पाणीपुरवठा योजना आणि औद्योगिक वापरानंतर ३७.५८ द.ल.घ.मी. पाणी नळगंगेत सोडले जाणार आहे. नळगंगा प्रकल्पाची साठवणूक ६९.३२ द.ल.घ.मी. आहे. त्यात ही भर पडल्यावर हा साठा ९८.९० द.ल.घ.मी. वर पोहोचणार आहे.
...
चार प्रकल्प जुळणार वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. पूर्व विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पातून (पवनी, जि. भंडारा) पाणी उचलून ते पश्चिम विदर्भातील नळगंगा प्रकल्पात पोहचविण्याची योजना असली तरी या ४२६.५४२ किलोमीटर लांबीच्या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प (आर्वी), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (बार्शी-टाकळी) आणि पुढे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा) प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमध्ये ३५ तलाव खोदले जाणार असून, चार तलावांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे पाणी या ३९ तलावांमध्ये खेळविले जाणार आहे. त्यातून १६,९४० हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे तर सिंचन क्षमता वाढविली जाणाऱ्या तलावांतून २,८७८ हेक्टर कृषिक्षेत्राला लाभ मिळणे प्रस्तावित आहे.
....
..असा होईल पाण्याचा प्रवास
गोसेखुर्द ते लोअर वर्धा - १६७.०९ किमी
लोअर वर्धा ते काटेपूर्णा - १३०.६० किमी
काटेपूर्णा ते नळगंगा - १२७.०२ किमी
...
प्रस्तावित साठवण तलाव
नागपूर जिल्हा
कुही तालुका : सातारा, पांडेगाव सावरगाव, खुर्सापार, खलसाना,
उमरेड तालुका : सायकी, मकरधोडा, पांढरबोडी, ठाणा, खैरगाव-कारगाव
हिंगणा तालुका : वडगाव, भान्सुली
नागपूर तालुका : मांगली
वर्धा जिल्हा
सेलू तालुका : सेलडोह, जुवाडी खैरी, बोरखेडी कलान, तामसवाडा
आर्वी तालुका : सुखळी, मालतपूर, खुर्झाडी, वायफड, दहीगाव
वर्धा तालुका : रोता १, रोता २
यवतमाळ जिल्हा
बाभूळगाव तालुका : बेंबळा
नेर तालुका : खंडाळा
अमरावती जिल्हा
धामनगाव तालुका : वडगाव दिपोरी,
नांदगाव खं. तालुका : येरंडगाव, नांदगाव, शेलगुंड, टाकळी कन्नाड, पापळ-१, खरबी
अकोला जिल्हा
बार्शी टाकळी तालुका : लोअर काटेपूर्णा, येलवन
अकोला तालुका : सीसा उडेगाव, चिखलगाव
बुलढाणा जिल्हा
शेगाव तालुका : कोलारी, शेलोडी
...