जलयुक्त शिवार आता लोकचळवळ

By Admin | Updated: June 8, 2015 02:57 IST2015-06-08T02:57:52+5:302015-06-08T02:57:52+5:30

जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात ...

Water Shutter is now a freak movement | जलयुक्त शिवार आता लोकचळवळ

जलयुक्त शिवार आता लोकचळवळ

मुख्यमंत्री फडणवीस : हिंगणा, काटोल, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील जलसंधारण कामांची पाहणी
नागपूर : जलयुक्त शिवार या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘जलयुक्त शिवार’ हे केवळ अभियान राहिले नसून ती आता लोकचळवळ बनली आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर जिल्ह्यातील मोंढा, उखळी, जुनेवाणी, किन्ही (हिंगणा), काटोल तालुक्यातील पांजरा (काटे), बाजारगाव, बोरगाव, नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील धानोली, घुरखेडा आदी गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू नाला, खोलीकरण, नाला रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध, आर्ट आॅफ लिव्हिंग अंतर्गत लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, माजी आ. विजय घोडमारे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, कृषी अधिकारी सहभागी झाले होते.
जुनेवाणी येथे पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात ६ हजार गावांमध्ये २७ विविध प्रकारची कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू आहेत. अजूनही ८२ टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही. या अभियानांतर्गत लोकसहभागातून सुमारे ३० कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गरज भासल्यास काही कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या पावसाळ्यात या कामाचे दृश्यरुप पाहायला मिळेल आणि त्यानंतर स्वत:हून लोकं मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, येत्या पाच वर्षात राज्यातील २० हजार गावे दुष्काळमुक्त होतील. जलक्रांतीशिवाय आता पर्याय नाही. सिमेंटनाला बांध, माती नालाबांध, शेततळे, नाला, बंडींगमध्ये पावसाळ्यात पडणारे पाणी साठविल्यानंतर जमिनीतील पाण्याची पातळी आपोआप वाढेल. उखळी मोंठा येथील नाला खोलीकरणाची पाहणी करताना ते म्हणाले, नाल्याच्या काठावर वृक्ष लागवड केल्यास काठावरील माती ढासळणार नाही, आणि पर्यावरणाचेही संवर्धन होईल. कामाच्या दुरुस्तीसाठी अधिकचा निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मोंढा, उखळी शिवारात कृषी विभागामार्फत एकूण नऊ कामे करण्यात आली. पहिल्या नाल्याची लांबी २९० मीटर तर खोली २.८० मीटर करण्यात आली. त्यामुळे ७.८२ टी.बी.एच. जलसाठा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या नाल्याची लांबी २४५ मीटर आणि तिसऱ्या नाल्याची लांबी २२५ मीटर करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाचं सहसंचालक विजय घावटे व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी संयुक्तरीत्या दिली.
आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेमार्फत हिंगणा तालुक्यातील जुनेवाणी, डेगमा, अंबाझरी, खामली शिवारातील कामांसाठी पाच पोकलॅण्ड मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यात २२ कि.मी. लांबीच्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले.
यावर १ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, त्यातील १७ लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण कामाविषयी समाधान व्यक्त केले असून, ही कामे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Water Shutter is now a freak movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.