शुभांगी काळमेघ नागपूर : विदर्भात यंदा मान्सून थोडा लवकर दाखल झाला असला, तरी पावसाचे प्रमाण अजूनही स्थिर नाही. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हा पाऊस ‘मान्सूनपूर्व’ असून, यावर विश्वास ठेवून पेरणी करणे धोका पत्करण्यासारखे ठरू शकते.
काय आहे धोका?हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील शेतकऱ्यांनी जर आताच पेरणी सुरू केली, तर पुढील आठवड्यात पावसाची विश्रांती पडल्यास उगवलेले पीक कोरड्या हवामानामुळे नष्ट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
मृग नक्षत्राची वाट पाहा!८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होणार आहे. त्या काळात हवामान खात्याने अधिक स्थिर व नियमित पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, मृग नक्षत्रातच पेरणी करावी. किमान ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेशी ओल असल्यावरच पेरणी करणे शहाणपणाचे ठरेल.
कृषी विभागाचा सल्ला
- पावसावर भरवसा ठेवा, पण योग्य वेळेची वाट पहा
- हवामान विभागाच्या सूचना लक्षात घ्या
- जमीन ओलसर असेल तेव्हाच पेरणी करा
शेतकऱ्यांनी सध्या हवामानाची स्थिती लक्षात घेऊन, घाई न करता, वैज्ञानिक पद्धतीने व वेळेवर पेरणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. चुकीच्या वेळी पेरणी केल्यास, शेतीचे नुकसान होऊ शकते.