वानाडाेंगरी नगर परिषद ‘प्रभारी’भराेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST2021-02-23T04:13:38+5:302021-02-23T04:13:38+5:30
नरेंद्र कुकडे लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : वानाडाेंगरी (ता. हिंगणा) नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात ...

वानाडाेंगरी नगर परिषद ‘प्रभारी’भराेसे
नरेंद्र कुकडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : वानाडाेंगरी (ता. हिंगणा) नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर या नगर परिषदेला तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. शिवाय, पालिकेतील महत्त्वाच्या विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे शहरातील विविध विकासकामांना खीळ बसली असून, दुसरीकडे नागरिकांना त्यांची छाेटी-माेठी कामे करण्यासाठी पालिका कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात.
वानाडाेंगरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत नंदवार यांना तांत्रिक कारणांमुळे २७ नाेव्हेंबर २०२० राेजी निलंबित करण्यात आले. त्यानंतर शासनाने या पालिकेवर पूर्णवेळी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही. या नगर परिषद कार्यालयातील काही संवर्ग कर्मचाऱ्यांची सेवा इतरत्र संलग्न केली जात आहे, तर काही कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार साेपविला जात आहे. त्यामुळे या कार्यालयात महत्त्वाच्या पदावर फार थोडे अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.
या कार्यालयात कर निर्धारण व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्त आहे. त्यातील एक कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहे, तर इतर तीन कर्मचाऱ्यांपैकी अमेय मेटांगळे यांची सेवा हिंगणा नगरपंचायत कार्यालयाला संलग्न केली आहे. रवींद्र बारापात्रे यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे संलग्न केली आहे. विशाल नरवाडे यांना आठवड्यातील तीन दिवसांसाठी बुटीबोरी नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त पाणीपुरवठा अभियंता अश्विनी साठवणे यांना बुटीबोरी नगर परिषद, तर नगर अभियंता संतोष मुलकलवार यांच्याकडे कन्हान नगर परिषदेचा कार्यभार साेपविला आहे. या पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी तर नाहीच, पण संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारीदेखील पूर्णवेळ नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज खोळंबले आहे. शासनाच्या अनास्थेमुळे वानाडाेंगरी नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळत नाही, असा आराेप नागरिकांनी केला असून, छाेटीमाेठी कार्यालयीन कामे कित्येक दिवसांपासून खाेळंबली असल्याचेही अनेकांनी सांगितले. त्यामुळे शासनाने तातडीने मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
नागरिकांची कामे खाेळंबली
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना जन्म, मृत्यू व रहिवासी दाखले, कर आकारणी उतारे यासह अन्य महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. फेरफारची प्रकरणे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. सध्या काेराेना संक्रमणाचा काळ असून, वानाडाेंगरी शहरातही काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरात प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, याकडेही जिल्हा प्रशासनासह शासनाने कानाडाेळा केला आहे.