पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:21+5:302021-02-11T04:09:21+5:30
रामटेक : पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या मायनर रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातून काचुरवाही-मसला मायनर गावालगत गेला आहे. ईश्वर चरडे ते ...

पेंच कालवा अतिक्रमणाच्या विळख्यात
रामटेक : पेंच जलाशयाच्या मुख्य कालव्याच्या मायनर रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातून काचुरवाही-मसला मायनर गावालगत गेला आहे. ईश्वर चरडे ते राजेंद्र धुर्वे यांच्या घरापर्यंत काही नागरिकांनी या मायनरलगत अतिक्रमण केले असून, काहींनी त्यात पाइपद्वारे घरामधील सांडपाणी सोडले आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येत आहे. याबाबत लोकमतला वृत्त येताच पाटबंधारे विभागाने जागा रिकामी करण्याची नोेटीस अतिक्रमणधारकांना दिली. नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे उपअभियंता धोटे यांनी सांगितले. काही नागरिकांनी मायनरच्या परिसरात अतिक्रमण करून तिथे टिनाचे शेड तयार करून गोठे तयार केले आहेत. काहींनी लाकडांचा ठीग ठेवला आहे. काही जण त्या जागेचा वापर गुरे बांधण्याकरिता करतात. यावर कळस म्हणजे काहींनी त्याच्या घरांमधील सांडपाणी पाइपद्वारे चक्क या मायनरमध्ये सोडले आहे. याच परिसरात व मायनरमध्ये काटेरी झुडपे वाढली आहेत. या मायनरद्वारे परिसरातील शेतामध्ये सिंचनासाठी पाणी पुरवले जाते. देखभाल दुरुस्ती व साफसफाईअभावी हा मायनर बुजल्यागत झाला आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी या मायनरद्वारे शेतापर्यंत पोहोचण्याची ही शक्यता मावळली आहे. धानाचे पीक आणि बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली जात आहे. या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही. अतिक्रमण झाल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधून-मधून कालवा मायनरची पाहणी करीत असल्याने त्यांना या अतिक्रमणाबाबत माहिती आहे; परंतु ते हटविण्याबाबत व अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करण्यात पुढाकार घेत नाही. यासंदर्भात लोकमतने सिंचन विभागाचे लक्ष वेधले होते. शेतीला सिंचनासाठी पाणी मिळावे, तसेच नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास संपवण्यासाठी या मायनरच्या परिसरात अतिक्रमण हटवावे तसेच मायनरची साफसफाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; पण याबाबत नोटीस मिळाली नसल्याचे काहींनी सांगितले.