ठहरिये होश मे आऊ...तो चले जाईएगा..!!

By Admin | Updated: June 15, 2015 03:01 IST2015-06-15T03:01:22+5:302015-06-15T03:01:22+5:30

सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा भावगर्भ रेशमी स्वर...गीतांच्या आठवणींचे सुरेल हिंदोळे...

Wait, come in the senses ... then it will go away .. !! | ठहरिये होश मे आऊ...तो चले जाईएगा..!!

ठहरिये होश मे आऊ...तो चले जाईएगा..!!

स्वरसम्राज्ञी सुमन कल्याणपूर यांचा सत्कार : मैत्री परिवाराचे आयोजन
नागपूर : सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा भावगर्भ रेशमी स्वर...गीतांच्या आठवणींचे सुरेल हिंदोळे...कालातीत भावनांना थेट हृदयापर्यंत पोहोचविणारा आवाज आणि सामान्य रसिकांच्या संवेदनेला घातलेली सादच. शब्दांना स्वरांच्या कोंदणाने आणि भावपूर्ण गायकीने परिसस्पर्श करणाऱ्या सुमनतार्इंना प्रत्यक्ष अनुभवताना रसिक ‘नॉस्टॉल्जिक’ झाले. त्यांनाच ऐकत राहण्याची इच्छा असताना त्यांनी निरोप घेतला. ‘ठहरिए होश मे आऊ...तो चले जाईयेगा...’ नेमकी हीच स्थिती या कार्यक्रमात रसिकांची झाली.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने ‘सुमनगंध’ या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी सुमन कल्याणपूर यांची अनौपचारिक मुलाखत, सत्कार आणि त्यांच्या गीतांचा कार्यक्रम नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. निवेदक मंगला खाडिलकर यांनी ही मुलाखत मोठ्या खुबीने खुलविली आणि त्यांच्याकडून काही गीते ऐकण्याचा आनंदही रसिकांना दिला. अनेक अजरामर हिंदी, मराठी गीतांचे गायन केलेल्या सुमनतार्इंनी एकूण १३ भाषांत गीते गायिली आहेत. पानांआड असलेला हिरवा चाफा चटकन दिसत नसला तरी त्याचा सुगंध मात्र त्याच्या अस्तित्वाची खूण पटवून देतो. सुमनतार्इंच्या सुरेल लोकप्रिय गीतांच्या सुगंधात आज रसिक हरविले. कार्यक्रमाचे उद्घाटन पं. प्रभाकरराव धाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विलास डांगरे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, संजय भेंडे, प्रमोद पेंडके, मंगला खाडिलकर, विष्णू मनोहर आणि सुमनतार्इंची मुलगी चारुल प्रामुख्याने उपस्थित होते. सुमनतार्इंनी गायलेल्या भूपाळीपासून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. काही गीते सादर झाल्यावर रसिकही सुमनतार्इंना ऐकण्यासाठी उत्सुक होते. त्या सभागृहात आल्या तेव्हाच उत्स्फूर्तपणे चाहत्यांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला. सुमनतार्इंनी बोलावे, गीत सादर करावे आणि सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटाचा गच्च पाऊस पडत राहावा, असाच हा अनुभव होता. शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा आवाज ऐकल्यावरच टाळ्यांचा कडकडाट झाला.
मग काय? गीतांचा प्रवास, त्यांच्या आवडत्या गायिका, या प्रवासातील काही अडथळे आणि त्यांनी गायलेल्या गीतांचे गायन....बस्स...यांनी सारा माहोल जिंकून घेतला. अतिशय साधेपणाने त्यांनी घराच्या पाण्याच्या टाकीवर बसून कसा रियाज केला, ते सांगितले. ‘नाविका रे.., शब्द शब्द जपून ठेव, आजकल तेरे मेरे प्यार के...’ अशा गीतांच्या सादरीकरणाने ही मैफिल अप्रतिम भावसौंदर्याने रंगली. कार्यक्रमात सुरभी ढोमणे, मुकुल पांडे, धनश्री देशपांडे यांनी गीत सादर केले. सुरसंगमचे सचिन ढोमणे यांनी संगीत संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी यावलकर आणि आभार मृणाल पाठक यांनी मानले. उदबत्ती विझल्यावरही त्याचा सुगंध दरवळत राहतोच. कार्यक्रम संपला पण रसिकांच्या मनात या कार्यक्रमाने स्वत:चा एक स्वतंत्र अबाधित कप्पा कायमचा कोरुन घेतला. त्यात सुमन कल्याणपूर नेहमीच असतील. (प्रतिनिधी)
नाना मिसाळांनी
काढले चित्र
मुलाखत सुरु असताना चित्रकार नाना मिसाळ यांनी सुमनतार्इंचे रेखाचित्र काढले. यात त्यांनी सुमनतार्इंचा भाव नेमकेपणाने पकडला. सुमनतार्इंनी त्याची प्रशंसा करीत नागपूरकर रसिकांचेही आभार मानले.

Web Title: Wait, come in the senses ... then it will go away .. !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.