भरकटलेले स्वर आणि कंटाळलेले रसिक
By Admin | Updated: September 17, 2014 00:57 IST2014-09-17T00:57:12+5:302014-09-17T00:57:12+5:30
संगीतांच्या कार्यक्रमांबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की, काही कलावंतांसाठी कला सादरीकरण करणे हे त्यांचे पोट आहे.

भरकटलेले स्वर आणि कंटाळलेले रसिक
नागपूर : संगीतांच्या कार्यक्रमांबाबत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की, काही कलावंतांसाठी कला सादरीकरण करणे हे त्यांचे पोट आहे. जगण्यासाठी त्यांच्याजवळ कलाच आहे. पण व्यावसायिकदृष्ट्या कलेच्या सादरीकरणातून रसिकांना आनंद देण्याचा कलावंतांचा प्रयत्न असायला हवा. काही कलावंत हा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात. सध्याच्या एकूणच व्यावसायिक वातावरणात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना प्रायोजक शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याला पर्याय नसतो पण प्रायोजक कार्यक्रमाला मदत करताना त्यांच्या कुटुंबीयांना गाण्याची संधी मिळावी, अशी अट टाकतात तेव्हा आयोजकांजवळ इलाज उरत नाही. यामुळे केवळ शेजाऱ्यांच्या कौतुकाचे विषय असलेल्या या तथाकथित गायकांना सहन करण्याची वेळ रसिकांवर येते आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
दर्जाहीन कार्यक्रम अन् कंटाळलेले रसिक
नागपूर हे रसिकांचे शहर आहे. येथल्या रसिकतेला बालगंधर्वांच्या काळापासून अनेक कलावंतांनी सलाम केला आहे. आवडले तर डोक्यावर घ्यायचे आणि नाही आवडले तर थेट बोलून मोकळे व्हायचे, हा इथल्या रसिकांचा स्वभाव आहे. प्रारंभीच्या काळात आपल्या शहरातील कलावंत म्हणून रसिकांनी गायक कलावंतांचे लाड केले. त्यांच्या चुका समजून घेतल्या आणि गायनाच्या क्षेत्रात समोर जाण्यासाठी गायकांना प्रोत्साहन दिले. पण अनेक गायकांनी प्रेक्षकांना गृहितच धरले आणि त्यांच्या गायनात बदल करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले नाही. त्यामुळे अनेक गायकांच्या गायनात तोचतोचपणा येत राहिला. गाण्यातल्या हरकती, गीतांतील काही नाजूक जागा, आशयपूर्ण आणि भावपूर्ण सादरीकरण हरविले. त्यामुळे हल्ली अनेक कार्यक्रमांची रेलचेल असली तरी रसिक या कार्यक्रमात फारसे रिलेट होऊ शकत नाही. कार्यक्रमाला आलेले अनेक रसिक दोन-चार गीत झाल्यावर काढता पाय घेतात.
शहरात संगीताचे अनेक कार्यक्रम होतात पण त्यात सारखेपणा आला आहे. काही संकल्पनांवर कार्यक्रमांचे सादरीकरण होते पण त्या संकल्पनांवर अभ्यासपूर्णता आणि वेगळेपण आणण्याचा प्रयत्न होत नसल्याने रसिकांना त्यात फारशी मजा येत नाही. अनेक हवसे-गवसे गायकही थेट जाहीर कार्यक्रमात भरकटलेल्या स्वरात गातात त्यामुळे रसिक मूळ गाण्यांचा आनंदच विसरत चालले आहे. जाहीर कार्यक्रमात गीतांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून मोठ्या आवडीने येणारे रसिक कार्यक्रम झाल्यावर मात्र नापसंती दर्शवीत आहेत. काही अपवाद वगळता गायकांमध्येही सुधारणा नाहीच. ज्यांना योग्य पद्धतीने गाणे सादर करता येत नाही, संगीताचा अभ्यास नाही आणि गाण्यात माधुर्य आणता येत नाही. अशा गायकांनी खासगी कार्यक्रम करावेत, सार्वजनिक कार्यक्रमात मात्र रसिकांना वेठीस धरू नये, असे मतही रसिकांनी व्यक्त केले आहे. काही लोक केवळ पैशांच्या भरवशावर रसिकांच्या आनंदाचा विचका करतात. त्यामुळे गीतांच्या कार्यक्रमाला जाण्यात रसिकांचा अपेक्षाभंग होतो आहे. याकडे गायकांचे, आयोजकांचे दुर्लक्ष होत असून आता आयोजक संस्थांनी याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याची सूचना या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
अकादमीच्या नावाने चांगभल
सध्या शहरात गल्लोगल्ली संगीत क्लासेस, अकादमींची स्थापना करण्यात आली आहे. या संगीत अकादमीत प्रवेश देतानाच संगीताचे प्रशिक्षण देताना अवघ्या महिन्याभरात थेट रंगमंचावर गायन करण्याची संधी देण्याचे आमिष दाखविले जाते. हल्ली प्रत्येकालाच झटपट प्रसिद्धीचा हव्यास असतो. त्यामुळे आपण गायनात किती तयार आहोत, याचा कसलाही विचार न करता नवसे कलावंत आपण गायक असल्याच्या आविर्भावात रंगमंचावर येतात. अशा अकादमी शहरात जास्त संख्येने असणे हे एका दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे अनेक लोक संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहित होतात पण अकादमीत संगीत गांभीर्याने शिकविले गेले पाहिजे. गायकांच्या तयारीसाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि जोपर्यंत गायक तयार होत नाही तोपर्यंत त्याला रंगमंचावर जाहीर कार्यक्रमात गीत सादर करण्यापासून थांबविले पाहिजे. अशा गायकांना संधी देताना जाहीर कार्यक्रमात संधी देण्यापेक्षा अकादमीच्या अंतर्गत कार्यक्रमात प्रोत्साहन म्हणून गायनाची संधी देणे समजता येण्यासारखे आहे. पण जाहीर आणि व्यावसायिक कार्यक्रमात गायनाची समज नसणाऱ्या गायकांना स्थान देणे प्रेक्षकांवर अन्याय करणारे आहे. थेट जाहीर कार्यक्रमात संधी देण्याचे आमिष दाखवून अकादमी केवळ आपला व्यवसाय पाहते. तो पाहायला हरकत नाही पण त्यासाठी प्रेक्षकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न अशा अकादमींनी करायला नको, अशाही प्रतिक्रिया या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आल्यात. (लोकमत चमू)