हिंसक घटनांमुळे उपराजधानी अस्वस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:14+5:302021-02-24T04:09:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या दोन दिवसांत हिंसक घटनांनी उपराजधानीला पुन्हा एकदा अस्वस्थ केले आहे. बजाजनगरात संशयी नवऱ्याकडून ...

Violent incidents upset the capital | हिंसक घटनांमुळे उपराजधानी अस्वस्थ

हिंसक घटनांमुळे उपराजधानी अस्वस्थ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या दोन दिवसांत हिंसक घटनांनी उपराजधानीला पुन्हा एकदा अस्वस्थ केले आहे. बजाजनगरात संशयी नवऱ्याकडून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न, सोनेगावमध्ये गुंडांनी गुंडाची केलेली हत्या, सीताबर्डीत तिघांनी एका कारचालकावर केलेला प्राणघातक हल्ला आणि कळमन्यात एका वृद्धेची तिच्याच नातीने हत्या करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यात वाठोड्यात एका महिलेची हत्या झाल्याचे उघड झाल्याने पोलीस दलही अस्वस्थ झाले आहे.

रविवारी रात्री बजाजनगरात आरोपी सूर्यकांत शाहू याने त्याची विभक्त पत्नी ईशिका उईके हिच्यावर चाकूचे घाव घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने बजाजनगर पोलिसांची धावपळ उडवली असतानाच ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कजवळ राजकुमार संजय जावा (वय २४) या तरुणावर आरोपी सागर शंकर मसराम (वय १९), गाैरव मनोज कहारे (वय २१) आणि लक्ष्मण राजेश गोदिया (वय २०, तिघेही रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी). या तिघांनी रविवारी रात्री ११ वाजता प्राणघातक हल्ला चढवला. जावा त्यांच्या ऑडीकारने पुढे जात होते. तर, मागून आरोपी दुचाकीवर ट्रीपल सीट येत होते. आरोपींनी वारंवार हॉर्न वाजवूनही बराच अंतरापर्यंत जावा यांनी त्यांना साइड न दिल्याने आरोपींनी जावा यांच्या कारसमोर सिनेस्टाइलने आपली दुचाकी लावली आणि वाद घालून जावा यांना चाकूने भोसकले. जावा गंभीर जखमी असून आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी या गुन्ह्याचा पोलिसांनी उलगडा केला. याचदरम्यान, सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास आरोपी योगेश ऊर्फ ढोकला लालजी पटेल (वय २०, रा. कळमना) याने पांडुरंग नगर, कमल किराणा दुकानाजवळ राहणाऱ्या तुळशीबाई गोवर्धन गायकवाड (वय ७०) यांच्यावर चाकूने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपी ढोकला याची जखमी वृद्धा आजी होय. तुळशीबाईने पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्याने हा हल्ला केल्याचे समजते. कळमना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी सोनेगाव ठाण्याच्या हद्दीत सहा गुंडांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड नीलेश नायडू याची हत्या केली. तर, त्याच्या साथीदाराला जबर जखमी केले. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची कोठडी मिळवली आहे. या घटनेच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच मंगळवारी सायंकाळी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हंसा युवराज पटले (वय ३०) नामक मजूर महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे उघड झाले. तिची हत्या अनैतिक संबंधातून झाली असावी, असा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी रात्री हंसाचा पती आणि तिच्या संपर्कातील एकाला संशयावरून ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती. दोन दिवसांत घडलेल्या या घटनांनी सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांमध्येही खळबळ उडवून दिली आहे.

---

... तरीही घडत आहेत गुन्हे

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सराईत गुंडांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वच पोलीस ठाण्यातील सराईत गुंडांची रोज झाडाझडती घेतली जात आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणून बसवून त्यांची चौकशी केली जात आहे. अनेकांवर नव्याने प्रतिबंधक कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. तरीसुद्धा बॉडी अफेन्स (शारीरिक दुखापतीचे गुन्हे) घडतच असल्याने खुद्द पोलीसही अस्वस्थ झाले आहेत.

---

Web Title: Violent incidents upset the capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.