शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:02+5:302021-09-14T04:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा ...

The victim was killed due to a quarrel between the neighbors | शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

शेजाऱ्यांमधील कटकटीमुळे गेला अवेजचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कटकटीतून पिवळी नदी परिसरात राहणारा अवेज बब्बू पठाण (वय २०) याचा बळी गेल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास आरोपी शुभम डांगे, जितू राऊत, मयूर नेवारे, आरिफ रमजान खान आणि त्याच्या साथीदारांनी घातक शस्त्राचे घाव घालून अवेजची भीषण हत्या केली होती. या चाैघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलनगर, मसाळा टोली भागात राहणारे बब्बू फत्तेखा पठाण (वय ५३) यांच्या शेजारीच आरोपी शुभम डांगे राहतो. बब्बू यांचा मुलगा अवेज (वय २०) याच्यासोबत आरोपी डांगेचा अनेक दिवसांपासून वाद होता. अवेज सेंट्रिंगचे काम कराचया. त्यामुळे घरासमोरच बासबल्ली ठेवत होता. त्यावरून डांगे कुटुंबातील महिला तसेच अवेजच्या कुटुंबातील महिलांचे नेहमी वाद होत होते. शुभम आणि अवेज घरी असले की तेसुद्धा या वादात उडी घ्यायचे. ९ सप्टेंबरला त्यांच्यात असाच कडाक्याचा वाद झाला. अवेज गुन्हेगारी वृत्तीचा असल्याने तो नेहमी आरोपींना धमकावत होता. त्यामुळे शुभमने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यात त्याने त्याचा जावई जितू राऊत आणि साथीदारांनाही सहभागी करून घेतले. त्यानुसार, रविवारी रात्री दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपी बाहेर पडले. त्यांना अवेज दिसताच त्याच्यासोबत त्यांनी वाद घातला. धोका लक्षात घेऊन अवेज पिवळी नदी चाैकातून पळू लागला. आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि घातक शस्त्रांचे घाव घालून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाणेदार संजय जाधव, एपीआय सुधीर इंगे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून हत्येचा सूत्रधार शुभम डांगे, त्याचा जावई जितू राऊत, मयूर नेवारे आणि आरिफ खान या चाैघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस मंगळवारी न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी करणार आहेत.

----

हैदराबादहून परतला अन् ...

गेल्या वर्षी एका लुटमारीच्या प्रकरणात अवेजला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते. तिकडून परतल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हैदराबादला पाठवून दिले. तिकडे कामधंद्याला लाग अन् तिकडेच राहा, असे त्याचे कुटुंबीय त्याला म्हणायचे. मात्र, अवेज काही दिवसांपूर्वी नागपुरात परतला अन् अखेर आरोपींनी त्याचा जीव घेतला.

----

Web Title: The victim was killed due to a quarrel between the neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.