भाजीपाल्याचे ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग

By Admin | Updated: June 15, 2015 03:11 IST2015-06-15T03:11:25+5:302015-06-15T03:11:25+5:30

भाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच.

Vegetable 'corporate' marketing | भाजीपाल्याचे ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग

भाजीपाल्याचे ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग

जीवन रामावत नागपूर
भाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच. त्यामुळे कोणताही सुशिक्षित तरुण तो करण्याची हिंमत करीत नाही. मात्र एका तरुणाने या किरकोळ समजल्या जाणाऱ्या भाजीपाला विक्रीतून छोटा उद्योग उभा केला आहे, शिवाय शेतकऱ्यांना ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंगची दिशा दाखविली आहे. ओम पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.
बँकेतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. परंतु कोणताही व्यवसाय म्हटले की, त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. त्यावेळी ओमच्या खिशात मात्र केवळ दोन हजार रुपये होते, पण तरीही तो हिंमत हरला नाही. जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले आणि आज यशस्वी व्यवसायी झाला. तो संघर्ष करीत असताना त्याला पणन महामंडळाच्या ‘शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांच्या दारी’ या योजनेची माहिती मिळाली. स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्याला ती योजना पटली. त्यानुसार त्याने लगेच पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ न योजना समजून घेतली आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत त्याने खिशात कोणतेही भांडवल नसताना भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भांडे प्लॉट परिसरातील निर्मलनगरी येथे भाजीपाला विक्रीचे पहिले दुकान थाटले. त्याला ग्राहकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून त्याला चांगला पैसा मिळू लागला, शिवाय त्याचा आत्मविश्वासही वाढला. यानंतर त्याने सात शेतकऱ्यांना एकत्रित करू न ओम असोसिएट स्वयंसहाय्यता शेतकरी गट स्थापन केला. पुढे पणन महामंडळाकडून एक गाडी भाड्याने घेऊ न, आता त्या गाडीतून भाजीपाला विक्री करीत आहे, तसेच कृषी विभागाच्या मदतीने जाफरनगर येथे गे्रडिंग व पॅकिंग सेंटर उभारले. या सेंटरवर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला स्वच्छ करू न त्याचे पॅकिंग केल्या जाते. यानंतर आॅर्डरप्रमाणे तो घरपोच पोहोचून दिल्या जातो. अशाप्रकारे तो सुमारे ६०० ग्राहकांना भाजीपाला पोहोचवितो. यातून ओमला दर महिन्याला ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे तो म्हणाला.
७० तरुणांना रोजगार
सध्या ६०० पेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच भाजीपाला पोहोचविला जात असून, यातून ६० ते ७० तरुणांना रोजगार दिल्याचे समाधान यावेळी ओमने व्यक्त केले. शिवाय लवकरच शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्येही भाजीपाला पोहोचविण्याची योजना असल्याचे तो म्हणाला. त्याच्या या भाजीपाल्याला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. यातून त्याला चांगला नफा मिळत असून, शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत आहे. कृषी व पणन महामंडळाने शहरात सुमारे २० ते २५ गाड्यांचे वाटप केले असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे.
नोकरी सोडून थाटले दुकान
ओमने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न बँकेत नोकरी मिळविली. परंतु काहीच दिवसांत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. मात्र १५ हजार रुपयांच्या पगारात घर चालविणे त्याला कठीण झाले. शेवटी त्याने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. आज तो यात यशस्वी झाला असून, इतर तरुणांनाही रोजगार उपलब्ध करू न दिला आहे.

Web Title: Vegetable 'corporate' marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.