वसंत मून बाबासाहेबांच्या प्रेरणेचा एक योद्धा
By Admin | Updated: April 20, 2016 03:20 IST2016-04-20T03:20:17+5:302016-04-20T03:20:17+5:30
वसंत मून यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ ग्रंथ जमा करण्याची त्यांची जिद्द म्हणजे आंबेडकरी चळवळीचा वस्तुपाठ.

वसंत मून बाबासाहेबांच्या प्रेरणेचा एक योद्धा
यशवंत मनोहर : ताराचंद्र खांडेकर यांना वसंत मून पुरस्कार व साहित्यार्पण सोहळा
नागपूर : वसंत मून यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ ग्रंथ जमा करण्याची त्यांची जिद्द म्हणजे आंबेडकरी चळवळीचा वस्तुपाठ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने तयार झालेला हा एक योद्धा होता. संशोधक होता. वसंत मून हे आंबेडकरमयी झाले होते, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १७ खंड प्रकाशित होऊ शकले. त्यांच्याऐवजी आणखी कुणी असते तर या पद्धतीचे काम झालेच नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रकाशित झालेल्या खंडामुळेच जागतिक विचारधारेमध्ये बाबासाहेबांचे विचार आणखी चांगल्या पद्धतीने पोहचू शकले. यात छोटासा वाटा वसंत मून यांचाही आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग व स्मृतिविशेष वसंतराव मून प्रतिष्ठान यांच्यावतीने साहित्यार्पण व कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात वसंत मून प्रतिष्ठानतर्फे या वर्षीचा वसंत मून पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, सत्कारमूर्ती ताराचंद्र खांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, वसंत मून यांचे चिरंजीव मिलिंद मून उपस्थित होते.
डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, य.दी. फडके व अरुण शौरी यांनी केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातील विकृत लेखनावर एक अभ्यासक, संशोधक म्हणून वसंत मून तुटून पडले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड प्रकाशित करण्याच्या शासकीय कामात त्यांची झालेली अवहेलना, अपमान याची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे. कारण सध्याची स्थिती आपल्या सर्वांपुढे आहे.
आज जी व्यक्ती हे सर्व काम पाहते त्यांनी किमान वसंत मून यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेतले असते, तर आज स्थिती वेगळी असती, असेही ते म्हणाले. ताराचंद्र खांडेकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे नायक आहेत. त्यांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व हे प्रखर आंबेडकरवादी आहे. त्यांनी आपल्या जीवनाला आंबेडकरी अभियानाचे रूप दिले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
कुलसचिव मेश्राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाला शासनाने उशिरा सुरुवात केली असली तरी या वर्षीही विद्यापीठातर्फे विविध कार्यक्रम, उपक्रम सुरू राहणार आहेत. विद्यापीठाला दिलेली वसंत मून यांची ग्रंथसंपदा चिरकाल जतन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.(प्रतिनिधी)
सामूहिक जबाबदारीचा गौरव
सत्कारला उत्तर देताना ताराचंद्र खांडेकर म्हणाले, वसंतराव मून यांच्या नावाने हा पुरस्कार देऊन त्यांचा आदर व्यक्त करण्याची मला दिलेली ही संधी होय. मी सामूहिक जबाबदारीचा पाईक राहिलो आहे, यामुळे हा व्यक्तीचा गौरव नव्हे तर सामूहिक जबाबदारीचा गौरव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा गोळा करताना वसंत मून यांनी घेतलेले कष्ट याचा मी साक्षीदार आहे. ते बाबासाहेबांचे विनम्र अभ्यासक होते, असे म्हणत त्यांनी, मूळ बाबासाहेब आपण पोहचवित आहोत का, याकडे लक्ष वेधले. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान कलंकित करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे, असे मतही व्यक्त केले. मिलिंद मून म्हणाले, वडिलांनी मोठ्या कष्ठाने गोळा केलेली बाबासाहेबांची ग्रथसंपदा त्यांनी प्राणापलीकडे जपली. विद्यापीठाने ही ग्रथसंपदा आंबेडकर चळवळीतील अभ्यासकांना, संशोधकांना २४ तास उपलब्ध करून द्यावे, एवढीच विनंती आहे.
या दानामुळे वर्षानुवर्षे ज्ञान पुरविणे शक्य
आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू काणे म्हणाले, विद्यापीठाला मिळालेल्या वसंत मून यांच्या ग्रंथसंपदेसाठी वेगळा कक्ष तयार करण्याचा व त्यावर दानदात्याचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्याचा आमचा विचार आहे. दानामध्ये पुस्तकांचे दान हे अमूल्य आहे. या दानामुळे वर्षानुवर्ष अनेकांना ज्ञान पुरविणे शक्य झाले आहे. दरम्यान ताराचंद्र खांडेकर यांना स्मृतिचिन्ह व २२ हजार रुपये रोख देऊन वसंत मून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले. संचालन प्रा. रमेश शंभरकर यांनी तर आभार एस.के. गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाला माजी मंत्री नितीन राऊत, पीपल्स रिपब्लिकन पाटीर्चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ. शंकर खोब्रागडे यांच्यासह विचारवंत, साहित्यिक व मून कुटुंब उपस्थित होते.