नागपुरात गर्दी वाढताच लसीकरणाचे गेट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:23+5:302021-03-04T04:11:23+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी महानगरपालिकेचे नियोजन फसल्याने ज्येष्ठांचे हाल झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी, यात ...

नागपुरात गर्दी वाढताच लसीकरणाचे गेट बंद
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी महानगरपालिकेचे नियोजन फसल्याने ज्येष्ठांचे हाल झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी, यात सुधार होईल अशी अपेक्षा असताना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेडिकल) व मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गर्दी वाढल्याने अखेर गेट बंद करण्याची वेळ आली. ‘को-विन’ वेबसाईटमध्ये नेहमीसारखा तांत्रिक बिघाड आल्याने सर्वच केंद्रांवर गोंधळ उडाला. केंद्रातील कर्मचाऱ्यांना लाभार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वादवादीचे प्रकारही घडले.
६० वर्षांवरील व गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. परंतु अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याने व मनपा यावर तोडगा काढत नसल्याने लसीकरणाचे तीनतेरा वाजले. शहरातील ११ केंद्रांवर सकाळी ९ वाजतापासून गर्दी झाली. नेहमीसारखी ‘को-विन’वेबसाईटवर माहितीच डाऊनलोड होत नव्हती. यामुळे ज्येष्ठांकडून आधारकार्डची झेरॉक्स घेऊन ‘ऑफलाईन’ला सुरुवात झाली. मात्र काही केंद्रावर ज्येष्ठांना ‘को-विन’मध्ये नोंदणी करूनच लसीकरणासाठी येण्यास सांगितले जात होते. यामुळे गोंधळ उडाला. आजही लसीकरणासाठी आलेल्या शेकडो ज्येष्ठांना विना लसीकरण रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली.
- हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ज्येष्ठांसाठी एकच केंद्र
हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व आता ज्येष्ठ आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजाराच्या लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचे एकच केंद्र आहे. परिणामी, गर्दी उसळत आहे. लाभार्थी असूनही लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
- तर लसीकरणाचे केंद्र होतील ‘हॉटस्पॉट’
शहरातील ११ लसीकरण केंद्रांवर होत असलेल्या लाभार्थ्यांच्या गर्दीने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिथे २५ लोक बसू शकतील अशा ठिकाणी १०० वर लोक उभे राहत आहेत. केंद्राच्या आत आणि बाहेरही गर्दी वाढली आहे. यात ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. यामुळे लसीकरण केंद्र ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ‘मनपा आयुक्त’ जबाबदार राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.