मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात हजारावर तक्रारी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:44+5:302021-06-20T04:06:44+5:30
२०२० - ४,८०० २०२१ मेपर्यंत - ३५० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात कुठल्याही शहरात मोकळा प्लॉट ठेवणे ...

मोकळा प्लॉट सांभाळणे झाले कठीण; वर्षभरात हजारावर तक्रारी ()
२०२० - ४,८००
२०२१ मेपर्यंत - ३५०
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात कुठल्याही शहरात मोकळा प्लॉट ठेवणे सध्या धोक्याचे ठरत आहे. लॅण्डमाफिया सर्वच शहरात मोठ्या संख्येने वाढले आहेत. नागपूरचाच विचार केला तर वर्षभरात सरासरी हजारावर प्लॉट हडपल्याच्या तक्रारी दाखल होत असल्याचे दिसून येते.
नोकरदार असो की ज्याचे हातावर पोट आहे असे प्रत्येक जण शहरात आपले स्वत:चे घर असावे, यासाठी एकेक पैसा जोडून एक प्लॉट घेतात. पुढे जमेल तसे त्यावर घर बांधू, असा त्याचा विचार असतो. पैसे नसल्याने बहुतेकांचे प्लॉट कित्येक वर्षे मोकळेच असतात. नेमके अशाच मोकळ्या भूखंडांकडे लॅण्डमाफियांची नजर असते. अशा भूखंडांवर हे माफिया कब्जा करतात किंवा बनावट कागदपत्रे तयार करतात. बनावट लोक तयार करतात आणि त्याची परस्पर विक्री करतात. असे प्रकार शहरात आता रोजचीच बाब झाली आहे. यासोबतच संपत्तीच्या वादातूनही प्लॉटच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागपुरात २०१९ साली जवळपास १,२०० वर अशी प्रकरणे उघडकीस आली. २०२० मध्ये तब्बल ४,८०० तक्रारी दाखल झाल्या. यावर्षी मेपर्यंत ३५० प्रकरणे उजेडात आली आहेत. या भूखंड माफियांमुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत.
बॉक्स
एकच प्लॉट अनेकांना विकला
प्लॉटच्या संदर्भातील तक्रारीमध्ये एकच प्लॉट अनेकांना विकल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. खाेटे दस्तऐवज तयार करून आणि खोटे साक्षीदार व मालक उभे करून हे प्रकार हाेत आहेत.
बॉक्स
पोलीस-महसूल विभागही आरोपी
प्लॉट हडपण्याच्या प्रकारात पोलीस आणि महसूल विभागही आरोपीच्या पिंजऱ्यात येतात. या दोन्ही विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गुन्हेगार असे व्यवहार सर्रासपणे करतात. त्यामुळे या विभागानेही यासंदर्भात गंभीर असणे आवश्यक आहे.
बॉक्स
एसआयटी असावी
नागपुरातील भूखंड माफियांविरुद्ध कारवाईसाठी दोन वर्षांपूर्वी नागपुरात एसआयटी (विशेष तपास पथक) नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने मोठ्या प्रमाणावर भूखंड माफियांवर कारवाई केली. अनेकांना तेव्हा न्यायही मिळाला. परंतु नंतर ते बंद पडले. ही एसआयटी पुन्हा स्थापन होण्याची गरज आहे.
बॉक्स
प्लॉट असल्यास ही घ्या काळजी
सध्या सरकारने ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ई-अभिलेखच्या माध्यमातून घरबसल्याही आपला प्लॉट सुरक्षित आहे की नाही, याची तपासणी करता येते. प्लॉटधारकाने दर तीन महिन्याने आपल्या प्लॉटचे व्हेरिफिकेशन करावे. सातत्याने प्लॉटवर जाऊन पाहणी करावी.
कोट
अनेक जण ८-८ वर्षे प्लॉटकडे फिरकूनही पाहत नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या संपत्तीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. ई-अभिलेख या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपल्या संपत्तीचे ऑनलाईन व्हेरिफिकेशनसुद्धा करू शकता.
गजानन दाबेराव, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख