फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर

By Admin | Updated: May 26, 2014 01:12 IST2014-05-26T01:12:07+5:302014-05-26T01:12:07+5:30

फीट अँड फाईन राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचा वापर करीत असाल तर खबरदार.. हा आहारच तुम्हाला रोगराईच्या दारात लोटू शकतो. कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसताना नफेखोरीला

Use hazardous chemicals to harvest fruits | फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर

फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर

पोटाचे आजार, कॅन्सरचा धोका : प्रत्येकानेच सावध राहण्याची गरज

नागपूर : फीट अँड फाईन राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचा वापर करीत असाल तर खबरदार.. हा आहारच तुम्हाला रोगराईच्या दारात लोटू शकतो. कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसताना नफेखोरीला चटावलेल्या विक्रेत्यांमुळे फळांच्या रूपात बाजारातून दुखणे विकत घेऊन येण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करून झटपट नफा कमावण्यासाठी फळाचे ठोक आणि घाऊक विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी राजरोसपणे हा खेळ करीत आहेत. परिणामी पोटाचे विकार, त्वचा रोग आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना आमंत्रण मिळत आहे. या घातक रसायनांचा अंश फळांमध्ये उतरत असल्याने ग्राहक पैसे देऊन दुखणे विकत घेत आहेत. फळे पिकविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. मात्र ही गाईड लाईन धाब्यावर बसवत शहरातील शेकडो फळविक्रेते कॅल्शियम कार्बाइड, इकॉन सारखी घातक रसायने वापरून अनैसर्गिकरीत्या फळांना पिकवत आहेत.

नफेखोरीसाठी जीवाशी खेळ

झाडावरून तोडलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. मात्र झटपट नफा कमविण्यासाठी फळविक्रेते फळांच्या पेटीत कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या ठेवतात. त्यामुळे पेटीची उष्णता वाढून फळ वेळेच्या आधीच पिकते. वास्तविक या रसायनांमुळे फळांमधले नैसर्गिक सत्व कमी होते. शिवाय त्या फळांमध्ये रसायनांचा अंशही उतरतो. त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक ठरत आहेत. आंबा, चिक्कू, पपई, संत्रे, मोसंबी या सारखी जाड सालपटांची फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरले जाते तर केळी पिकविण्यासाठी इकॉन नावाचे केमिकल वापरले जाते.

ओळखण्याचे साधनच नाही

बाजारातून विकत घेतलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकलेले आहे की कृत्रिमरीत्या पकविले आहे, हे शोधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही.प्रयोगशाळेतच त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे मुजोर झालेले फळविक्रेते ग्राहकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.

रसायनयुक्त फळांमुळे

कॅन्सरचा धोका

कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा फळांच्या सेवनामुळे त्यातील रसायनांचे अंश पोटात जातात. त्यामुळे पोट बिघडणे, मळमळ करणे, अपचन, पोटाची जळजळ, जुलाब, डोकेदुखी, उलट्या सारख्या तक्रारी वाढतात. फळांमधील कार्बाइडच्या अंशामुळे शरीरात इथिलीन नावाचा गॅस तयार होतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत चालला आहे.

फळांमधूनही विषबाधा होऊ शकते

नैसर्गिकरीत्या पिकलेले कोणतेही फळ आरोग्यासाठी गुणकारी असते. मात्र कार्बाइडच्या माध्यमातून पिकविलेल्या फळांत रसायनांच्या अंशामुळे विषबाधा होऊ शकते. रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी फळांचा आहार प्रत्येकानेच घेतला पाहिजे. पोटाच्या माध्यमातून आपल्याला ही शक्ती मिळत असते. मात्र रसायनयुक्त फळांमुळे ही शक्तीच कमी होत आहे.

आरोग्यावर परिणाम

आंब्याचा सिझन असताना अनेक वेळा बाजारात गेल्यानंतर प्रत्येकालाच विकत घेण्याची इच्छा होते. समोरचे फळ कशा रीतीने पिकविले आहे, हे सामान्यांना कसे कळणार. अशा रासायनिक फळांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. प्रशासनाने त्याला आवर घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Use hazardous chemicals to harvest fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.