उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’साठी खडसेंचा आग्रह
By Admin | Updated: November 19, 2015 03:40 IST2015-11-19T03:40:43+5:302015-11-19T03:40:43+5:30
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही.

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’साठी खडसेंचा आग्रह
प्रशासनाला पाठविले पत्र : प्रकृतीचे कारण की नंबर दोनचा दावा?
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’साठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आग्रह धरला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्रदेखील लिहिले आहे. खडसेंना हा बंगला द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणीच होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या आग्रहामागे मंत्रिमंडळात स्वत:ची क्रमांक दोनची जागा सिद्ध करण्याचा प्रयत्न तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप झालेले नाही. ‘देवगिरी’ हा बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहे. परंतु राज्य शासनामध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही. त्यामुळे मागील अधिवेशनातदेखील ‘देवगिरी’ बंगला रिकामाच ठेवण्यात आला होता. यातून अनेक जेष्ठ मंत्र्यांचा भ्रमनिरासदेखील झाला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे कोणीही यावर भाष्य केले नाही.
यंदादेखील हा बंगला रिकामाच राहतो की काय याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच खडसे यांनी स्थनिक प्रशासनाकडे पत्र पाठवून प्रकृतीच्या कारणांमुळे ‘देवगिरी’ बंगला देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे खडसे यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी वारंवार व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’वर नाही, तर कमीतकमी उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’वर राहण्याची संधी मिळावी म्हणून तर त्यांनी अशी विनंती केली नाही ना, अशा चर्चांना ऊत आला आहे.(प्रतिनिधी)
नंबर दोन पद सिद्ध करण्यासाठी आग्रह
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल परिसरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला देण्यात आला आहे. तर त्या खालोखाल मोठा बंगला ‘रामटेक’ एकनाथ खडसे यांच्याकडे आहे. नागपुरातदेखील क्रमांक दोनचा बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी खडसे यांचा आग्रह आहे. यातून राज्य शासनातील क्रमांक दोनचे पद सिद्ध होणार आहे.
शेवटच्या क्षणी होणार निर्णय
कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोभित करण्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. परंतु बंगले कोणाला देण्यात येतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबतचा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील करतील. ‘देवगिरी’ आपल्याला मिळावा ही खडसेंची इच्छा आहेच व त्यांनी तशी विनंतीदेखील केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन बंगला द्यायचा की इतर मंत्र्यांची नाराजी नको म्हणून मागील वर्षीप्रमाणे यंदाही ‘देवगिरी’ रिकामाच ठेवायचा याचा निर्णय अखेरच्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.