नरेश डोंगरे
नागपूर : अजनी -बुटीबोरी - बोरखेडी या रेल्वे ट्रॅकवर (मार्गावर) आढळलेला महागडा मोबाईल रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) स्वाधिन करून ट्रॅक मॅनने प्रामाणिकपणाचा परिचय दिला. तर, महागडा मोबाईल हरविल्यामुळे आणि त्यासोबतच महत्वाचे संपर्क क्रमांकही गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या संबंधित प्रवाशाला आरपीएफने तत्परतेने शोधून काढले आणि त्याचा मोबाईल त्याला परत केला. अजनी आरपीएफच्या कार्यक्षेत्रातील ही घटना आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर नागपूर विभागात रेल्वे यंत्रणांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानके आणि संशयितांची कसून तपासणी केली जात असतानाच रेल्वे मार्गाची (ट्रॅकची)ही कसून तपासणी केली जात आहे. त्यासाठी रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस ट्रॅकची पाहणी करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे रेल्वे कर्मचाऱ्यांचे एक पथक अजनी बुटीबोरी ते बोरखेडीपर्यंतच्या रेल्वे मार्गाची पाहणी करीत असताना एकाला ट्रॅकवर महागडा मोबाईल पडून दिसला. त्याने तो ताब्यात घेतल्यानंतर अजनी आरपीएफच्या स्वाधिन केला. आरपीएफने या मोबाईलच्या मालकाला शोध लावला. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना मोबाईल परत घेऊन जाण्यासाठी बोलवून घेतले.
दरम्यान, महागडा मोबाईल तसेच त्यात असलेले अत्यंत महत्वाचे संपर्क क्रमांक आणि डाटा हातून निघून गेल्याने मोबाईल धारक कमालिचे अस्वस्थ झाले होते. रेल्वेत प्रवास करीत असताना आपला मोबाईल हरविल्यामुळे संबंधित मोबाईलधारक अस्वस्थ झाले होते. त्यांना आरपीएफने त्यांचा फोन परत करताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.शाळेची बॅग अन् महिलेची पर्सही परत
एका शाळकरी मुलाचे दप्तर घाईगडबडीत सेवाग्राम स्थानकात राहून गेले. आरपीएफला रेल 'मदत'च्या माध्यमातून तक्रार मिळताच संबंधित विद्यार्थ्याशी आरपीएफने संपर्क केला. नंतर त्याला त्याचे दफ्तर परत करण्यात आले. अशाच प्रकारे बैतूल स्थानकावर आरपीएफने एका महिला प्रवाशाची हरविलेली पर्स शोधून तिच्या स्वाधिन केली. नागपूर स्थानकावरही आरपीएफने एका एसीकोचमधील प्रवाशाची ट्रॅव्हल पाऊच शोधून त्याला परत केली.