अधिसूचना जारी : नवीन अधिकारी व कर्मचारी मिळणार नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता, या वाघांना अधिवासासाठी मुबलक जंगल उपलब्ध व्हावे, यासाठी पेंचच्या सभोवतालच्या बफर क्षेत्राचे नियंत्रण पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षकांच्या हाती सोपविण्यात आले आहे. यासंबंधी राज्याच्या महसूल व वन विभागाने अलीकडेच ८ जुलै रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनवर संबंधित क्षेत्र संचालकांचे एकसंघ नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.राज्य शासनाने आपल्या अधिसूचनेत बफर क्षेत्राच्या नियंत्रणासह सध्या येथे सुरू असलेली वानिकी कामेही पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांच्या नियंत्रणात चालतील, असे स्पष्ट केले आहे. शिवाय या बफर क्षेत्राच्या देखभालीसाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यासाठी गत काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली व यवतमाळ येथील काही वनक्षेत्र महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर, गडचिरोली व यवतमाळ येथील वनवृत्तात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी एक वन परिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल व १४ वनरक्षक यांची ३० जुलैपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात पदस्थापना करून, त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पेंच देशभरातील २५ व्याघ्र प्रकल्पापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. येथे पट्टेदार वाघांसह बिबट, चितळ, हरीण, नीलगाय, कोल्हा व जंगली कुत्री यासारख्या वन्यप्राण्यांसह विविध दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आढळून येतो. त्यामुळे गत काही वर्षांत पेंच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.(प्रतिनिधी)
पेंचचे ‘बझर’ क्षेत्र संचालकांच्या नियंत्रणात
By admin | Updated: July 15, 2014 01:12 IST