एसटी महामंडळाचे उमरेड, रामटेक डेपो माघारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:58+5:302021-04-07T04:07:58+5:30
नागपूर : मागील वर्षभरातील कोरोनाचे लॉकडाऊन, बंद असलेल्या शालेय बसफेऱ्या आणि ग्रामीण भागातून कमी झालेली वर्दळ यामुळे नागपूर जिल्ह्यातील ...

एसटी महामंडळाचे उमरेड, रामटेक डेपो माघारले
नागपूर : मागील वर्षभरातील कोरोनाचे लॉकडाऊन, बंद असलेल्या शालेय बसफेऱ्या आणि ग्रामीण भागातून कमी झालेली वर्दळ यामुळे नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि रामटेक या दोन आगाराची आर्थिक स्थिती खालावली आहे. ग्रामीण भागातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने या दोन्ही डेपोमधील ६० टक्के बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
नागपूर विभागांतर्गत असलेल्या आठ आगारापैकी नागपूर शहरात चार आगार असून काटोल, सावनेर, रामटेक आणि भिवापूर हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. नागपूर शहरातील आगाराची आर्थिक स्थिती बरी असली तरी उमरेड आणि रामटेक आगाराची स्थिती चांगलीच खालावली आहे. मागील वर्षभरातील अल्प उत्पन्नाचा फटका बसल्याने फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
उमरेड आगारात ४० एसटी बसेस आहेत. त्यांचा रोजचा प्रवास १५ हजार किलोमीटर असायचा. मात्र प्रवासी नसल्याने ४० पैकी सध्या फक्त १७ ते १८ बसेस चालविल्या जात आहेत. बसेसचा प्रवासही १५ हजार किलोमीटरवरून ७ हजार किलोमीटरवर आला आहे. रामटेक आगारातही अशीच स्थिती आहे. येथे ४५ बसेसपैकी फक्त २० बसेस चालविल्या जात आहेत. रोज होणारा १५ ते १४ हजार किलोमीटरचा प्रवास ८ हजार किलोमीटरखाली आला आहे. उत्पन्नही १ लाख ४० हजारावर आले आहे.
...
उत्पन्न घसरले दीड लाखावर
उमरेड आणि रामटेक या दोन आगाराचे रोजचे उत्पन्न चार लाख रुपयांवर होते. मात्र या दोन्ही ठिकाणचे उत्पन्न आता जेमतेम दीड लाख रुपयांवर आले आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. प्रवाशांची संख्या घटली आहे. शाळा बंद असल्याने फेऱ्या तोट्यात चालवून रिकाम्या बसेस चालविण्यापेक्षा ६० टक्के बसेस बंद करण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे.
...
मागील वर्ष तोट्याचेच
या दोन्ही आगारासह सर्वच आगारांना मागील वर्षभरात तोटाच आला. उमरेड आणि काटोलमध्ये ग्रामीण फेऱ्या अधिक आहेत. शालेय फेऱ्या ४० टक्के आहेत. शाळा बंद असल्याने वर्षभरापासून ४० टक्के बसेस उभ्याच आहेत. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.
...
कोट
प्रवासीसंख्या घटल्याने हा निर्णय दोन्ही आगारासाठी घ्यावा लागला. वाहक आणि चालकांना रोज न बोलावता एक दिवसाआड बोलावले जात आहे. वर्षभरापासून येथे आर्थिक फटका बसला आहे.
- नरेंद्र बेलसरे, विभागीय वाहतूक नियंत्रक
...