उमरेड-कऱ्हांडला होणार व्याघ्र प्रकल्प !

By Admin | Updated: September 4, 2016 02:49 IST2016-09-04T02:49:28+5:302016-09-04T02:49:28+5:30

‘जय’ या वाघामुळे प्रकाशझोतात आलेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयाण्याची आता ‘व्याघ्रप्रकल्पा’कडे वाटचाल सुरू झाली आहे.

Umerad-karandal will be a Tiger Tiger Project! | उमरेड-कऱ्हांडला होणार व्याघ्र प्रकल्प !

उमरेड-कऱ्हांडला होणार व्याघ्र प्रकल्प !

वन्यजीवप्रेमींचा रेटा : राज्यातील सहा पैकी पाच ‘टायगर प्रोजेक्ट’ विदर्भात
जीवन रामावत  नागपूर
‘जय’ या वाघामुळे प्रकाशझोतात आलेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयाण्याची आता ‘व्याघ्रप्रकल्पा’कडे वाटचाल सुरू झाली आहे. सध्या राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने, ४७ अभयारण्ये आणि चार संवर्धन राखीव क्षेत्रांसह एकूण ५७ संरक्षित क्षेत्र अधिसूचित आहे. शिवाय त्यांचे एकूण १०,०५१.५२९ चौ. कि. मी. एवढे क्षेत्र आहे. यापैकी ५ राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये अशा १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून मेळघाट, पेंच, ताडोबा-अंधारी, सह्यांद्री, नवेगाव-नागझिरा व बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. शिवाय आता उमरेड-कऱ्हांडला या अभयारण्याला सुद्धा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून रेटली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या महाराष्ट्रातील सहा पैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहे. १८९ चौ. कि. मी. च्या वन क्षेत्रातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य व्याघ्र राजधानीपासून अवघ्या ५८ किलो मीटर अंतरावर आहे. शिवाय या अभयारण्याचे वनक्षेत्र भंडारा जिल्ह्यातील पवनीपासून तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यापर्यंत विस्तारले आहे. सोबतच हा संपूर्ण जंगल चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुळलेला आहे. विशेष म्हणजे, येथील जंगल हा वाघांच्या अधिवासासाठी अनुकूल मानल्या जातो. त्यामुळेच मागील काही वर्षांत येथील वाघांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या येथील जंगलात ११ ते १२ वाघ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात तब्बल सात नर वाघांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा येथील वाघांच्या संख्येत वाढ होवू शकते. जानकारांच्या मते, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे एकूण क्षेत्र आणि येथील वाघांची संख्या ही बोर व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक आहे. त्यामुळे याही अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

वन्यजीव विभागाची फौज
नागपूर : वन विभागाने राज्यभरातील वन्यजीव क्षेत्राची तीन वन्यजीव वृत्त आणि १७ वन्यजीव विभागांमध्ये विभागणी केली आहे. यात एकूण ८४ वन परिक्षेत्र, २५० परिमंडळ आणि ९०९ नियत क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व वन्यजीव क्षेत्रांसह त्यामध्ये अधिवास करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी तब्बल ३ हजार ८२३ वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज सज्ज केली आहे. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी दिली असून, त्यांच्या मदतीला पाच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, सहा मुख्य वनसंरक्षक, तीन वनसंरक्षक, आठ उपवनसंरक्षक, १९ विभागीय वन अधिकारी, ५६ सहायक वनसंरक्षक, १०६ वन परिक्षेत्र अधिकारी, ३२२ वनपाल, १ हजार ५४१ वनरक्षक आणि १ हजार ७५६ इतरांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मागील दोन वर्षांत ताडोबा, पेंच व नवेगाव-नागझीरा येथे विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवानसुद्धा तैनात करण्यात आले आहेत.

विदर्भातील ‘टायगर प्रोजेक्ट’
राज्यभरातील सहा व्याघ्र प्रकल्पापैकी एकट्या विदर्भात पाच टायगर प्रोजेक्ट आहेत. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र १७२७.५९ चौ. कि.मी. एवढे असून, त्यात ६२५.८२ चौ. कि .मी.चे अति संरक्षित क्षेत्र आणि ११०१.७७ चौ.कि.मी.च्या बफर क्षेत्राचा समावेश आहे. मागील २७ डिसेंबर २००७ रोजी या व्याघ्र प्रकल्पासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्याचवेळी नागपूरपासून काहीच अंतरावर असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाची सुद्धा घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाचे एकूण क्षेत्र ७४१.२२ चौ.कि.मी. असून, त्यात २५७.२६ चौ.कि.मी.चे अति संरक्षित क्षेत्र आणि ४८३.९६ चौ.कि.मी.चे बफर क्षेत्र आहे. या व्यतिरिक्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र २७६८.५३ चौ.कि.मी. असून, यात १५००.४९ चौ.कि.मी.चे अति संरक्षित क्षेत्र आणि १२६८.०४ चौ.कि.मी.चे बफर क्षेत्र आहे. तसेच नुकत्याच २०१३ मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेले नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्र ६५६.३६ चौ. कि. मी. एवढे आहे. यानंतर २०१४ मध्ये तयार झालेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र केवळ १३८.१२ चौ.कि.मी. एवढे आहे.
वनक्षेत्र वाढविण्याची गरज
उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प झाला, तर हा निश्चितच स्वागतार्ह निर्णय ठरेल. मात्र सद्यस्थितीत या अभयारण्याचे वनक्षेत्र फारच कमी असून पुढील काही दिवसांत यापैकी पुन्हा बरेच क्षेत्र गोसेखुर्द प्रकल्पात जाणार आहे. मग अशा स्थितीत येथील अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. व्याघ्र प्रकल्पानंतर निश्चितच येथील वाघांची पुन्हा संख्या वाढणार आहे. परंतु त्या वाघांना अधिवासासाठी येथे वनक्षेत्र उपलब्ध झाले पाहिजे. अन्यथा येथील सर्व वाघ बाहेर निघून जातील आणि व्याघ्र प्रकल्प केवळ नावापुरता शिल्लक राहील. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यापूर्वी येथील वनक्षेत्र वाढविण्याची गरज आहे.
नितीन रहाटे, वन्यजीव पे्रमी.

Web Title: Umerad-karandal will be a Tiger Tiger Project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.