वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात कारमधील दोन तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST2021-09-14T04:11:13+5:302021-09-14T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पार्टी करून परत येताना वेगाशी स्पर्धा करणाऱ्या तरुणांची कार दुभाजकावर आदळली अन् नंतर झाडाला ...

Two young women were killed in a car accident | वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात कारमधील दोन तरुणी ठार

वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात कारमधील दोन तरुणी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पार्टी करून परत येताना वेगाशी स्पर्धा करणाऱ्या तरुणांची कार दुभाजकावर आदळली अन् नंतर झाडाला धडक देऊन एका घराच्या वॉलकम्पाऊंडवर धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुणी ठार झाल्या. त्यांचे दोन मित्र मात्र कारमधील बलूनमुळे बचावले.

अमरावती मार्गावरील भरतनगर चाैकाजवळ रविवारी रात्री १०.४० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भावना मोहन यादव (वय १८, रा. ३२३, सदर) आणि राशी दीपक यादव (वय २२, रा. धरमपेठ), अशी मृत तरुणींची नावे आहेत. चिराग राजेश जैन (वय २२, रा. सतरंजीपुरा) आणि गिरीश लक्ष्मण रामलखानी (वय २१, रा. न्यू वर्धमाननगर), अशी या अपघातात किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.

एमएच ३१-ईवाय ८८९९ क्रमांकाच्या कारमध्ये बसून भावना यादव, राशी यादव, चिराग जैन आणि गिरीश हे चाैघे रविवारी रात्री वाडी समोरच्या ॲटमॉस्पेअर नामक रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी करून रात्री १०.३० च्या सुमारास ते नागपूरकडे परत येत होते. चिराग कार चालवीत होता. गिरीश त्याच्या बाजूला तर भावना आणि राशी मागच्या सीटवर बसल्या होत्या. कार वेगाशी स्पर्धा करीत होती. त्यात चाैघांची धावत्या कारमध्ये गंमतजंमतही सुरू होती. भरतनगर चाैकाजवळ रात्री १०.४० च्या सुमारास कार आली तेव्हा काही क्षणासाठी चिरागचे लक्ष विचलित झाले अन् भरधाव कार दुभाजकावर आदळून पलीकडच्या झाडावर धडकली. कारचा वेग एवढा जास्त होता की झाडावर धडकल्यानंतरही कार थांबली नाही. बाजूच्या घराच्या वॉलकम्पाऊंडवर धडकल्यानंतर कार थांबली. कारमध्ये बलून असल्याने चिराग अन् गिरीशला काही झाले नाही, मात्र भावना आणि राशी गंभीर जखमी झाल्या. कारचीही पुरती मोडतोड झाली.

---

भाऊ होता मागच्या कारमध्ये

विशेष म्हणजे, या कारच्या मागेच काही अंतरावर भावनाचा भाऊ त्याच्या एका मैत्रिणीसह दुसऱ्या कारमधून येत होता. त्यानेच या अपघाताची माहिती पोलीस आणि नातेवाईकांना दिली. माहिती कळताच अंबाझरीचे ठाणेदार डॉ. अशोक बागुल आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी धावले. जखमी भावना आणि राशीला रविनगर चाैकातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी काही वेळेच्या अंतराने राशी आणि भावनाला मृत घोषित केले.

---

त्या अत्यवस्थ, ते पळून गेले

विशेष म्हणजे, भावना आणि राशीसोबत काही वेळेपूर्वीपर्यंत खाणेपिणे माैजमस्ती करणारे त्यांचे मित्र चिराग आणि गिरीश अपघात घडल्यानंतर या दोघींना अत्यवस्थ अवस्थेत सोडून पळून गेले. भावना आणि राशी शेवटच्या घटका मोजत असताना चिराग अन् गिरीश हे दोघे सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग, वर्धमाननगर भागात पोलिसांना चकमा देत फिरत होते. ते दारू किंवा दुसऱ्या कोणत्या अंमली पदार्थांच्या नशेत टुन्न असावेत, त्यामुळे ते पळून गेले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मृत भावनाचा भाऊ जयकृष्णा यादव याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास या दोघांना ताब्यात घेतले.

---

कुटुंबीयांचा आक्रोश

मृत भावना, राशी तसेच अपघातातून बचावलेले चिराग अन् गिरीश हे चाैघेही संपन्न कुटुंबातील सदस्य होत. ते मित्रांसोबत पार्टीला जाण्याचे कॉमन कल्चर मानत होते. रविवारी रात्री भावना आणि राशीसोबत भावनाचा भाऊ जयकृष्णाही सोबत असल्याने घरची मंडळी बिनधास्त होती. रात्री उशिरा भावना आणि राशीचा जीवघेणा अपघात घडल्याचे कळताच यादव कुटुंबीय इस्पितळात पोहचले. तेथे आधी राशीला आणि नंतर भावनाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश सुरू झाला. भावना आणि राशी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या.

----

Web Title: Two young women were killed in a car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.