अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST2021-02-20T04:17:23+5:302021-02-20T04:17:23+5:30

नरखेड/उमरेड/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील ...

Two killed in lightning strike | अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू

अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू

नरखेड/उमरेड/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील पचखेडी येथे गारपीट झाली. येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबतच भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सचिन रामाजी सहारे (३५) रा.पेंढराबोडी, अमोल नारायण काखे (२५) रा.ब्राह्मणी अशी मृतांची नावे आहेत.

जिल्ह्यात नरखेड, कुही, रामटेक आणि भिवापूर तालुक्यातील काही भागात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नरखेड तालुक्यातील सिंजर येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शिवारातील हरभरा,गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळून अमोल काखे याचा मजुराचा मृत्यू झाला. तो स्थानिक रहिवासी नामदेव क्षीरसागर यांचे गुरे चराईचे काम करीत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो ब्राह्मणी येथील रिजेंट शाळेच्या समोरील परिसरात गुरे चारत असताना कडाक्याच्या विजांसह पावसाला सुरुवात झाली. अमोल आडोसा घेण्याकरिता नजीकच्या निंबाच्या झाडाखाली उभा झाला असता त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आला.

भिवापूर तालुक्यात पेंढराबोडी येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतात हरभरा कापणी सुरु असताना सचिन रामाजी सहारे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये त्याचा लहान भाऊ अरविंद सहारे हा थोडक्यात बचावला. पांढराबोडी येथील सचिन सहारे याच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी थोड्याफार हरभऱ्याची कापणी केली होती. अशातच आज उर्वरित कापणी आणि वेचणी यासाठी सचिन त्याचा भाऊ अरविंद, वडील रामाजी, आई नत्थाबाई शेतमजुरांसमवेत शेतात होते. अशातच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. ढीग लावलेल्या हरभऱ्याला पावसापासून बचाव करण्यासाठी सचिन आणि अरविंद दोघेही ताडपत्री घेऊन धावले. अशातच वीज कोसळली. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Two killed in lightning strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.