कथेतून वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 19, 2014 00:46 IST2014-05-19T00:46:39+5:302014-05-19T00:46:39+5:30
लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे.

कथेतून वाचकांना जागृत करण्याचा प्रयत्न
समीक्षकांचा सूर : लोहिया अध्ययन केंद्रात तीन कथासंग्रहांचे प्रकाशन
नागपूर : लहान मुलांना झोपवायचे असले तर आजी, आजोबा त्यांना कथा सांगतात. कथा सांगताना मुलांना झोप यावी, हा उद्देश त्यावेळी असतो. पण हल्ली कथेची मागणी सातत्याने वाढते आहे. या कथा वाचकांना झोप लागण्यासाठी नाही तर त्यांची झोप उघडण्यासाठी आहेत. विचार देणार्या या कथासंग्रहातून वाचकांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न तीनही लेखकांनी प्रभावीपणे केला असल्याचे मत प्रकाशन समारंभाला उपस्थित समीक्षकांनी व्यक्त केले. लोहिया अध्ययन केंद्राच्यावतीने आज तीन पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या मधु लिमये सभागृहात आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रभा मेहता यांच्या ‘कन्यावती भव’, अहफाज अहमद कुरेशी यांच्या ‘तमाचा’ आणि नरेन्द्र परिहार यांच्या ‘दौडो अनिस’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजेन्द्र पटोरिया, डॉ. मिथिलेश अवस्थी, ओमप्रकाश शिव उपस्थित होते. उपाध्याय म्हणाले, कथालेखनासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. कवितेपेक्षाही कथा लिहिणे अधिक कठीण आहे. कारण कथेत वाचकांना बांधून ठेवतानाच त्यांना विचार द्यावा लागतो किंवा विचारप्रवृत्त करावे लागते. परिहार यांच्या कथा बांधेसूद तर मेहता यांच्या कथा सूक्ष्म मनोवृत्तीचे दर्शन घडविणार्या आहेत. कुरेशी यांनी कथांमधून वाचकांना विचार करायला भाग पाडले, असे ते म्हणाले. पटोरिया म्हणाले, तीनही लेखकांच्या कथा अतिशय संवेदनशील आहेत. नीरक्षीर विवेक बुद्धीने या कथांची मांडणी करताना केवळ माणसांचे जगणे केंद्रस्थानी कथांमध्ये आहे. परिहार यांच्या कथा यथार्थ दर्शन घडविणार्या आहेत. मुंबईच्या मायानगरीत नायिका होण्यासाठी जाणार्या युवतींचे कसे शोषण होते, यावर त्यांनी अभ्यासपूर्ण कथा लिहिली आहे. अवस्थी म्हणाले, सर्वच लेखकांच्या कथा प्रचलित व्यवस्थेवर आसूड ओढणार्या आणि अपेक्षा व्यक्त करणार्या आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणार्या या कथा माणसांना जगण्याचा अर्थ सांगणार्या आहेत, असे ते म्हणाले. मेहता यांनी पुरुषी मानसिकतेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले पण त्यांना अपराध सिद्ध करता आला नाही. या लेखकांनी सातत्याने लिहित राहावे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्राचे हरीश अड्याळकर, नाटककार अमर रामटेके, अग्रवाल आदी उपस्थित होते. संचालन नरेन्द्र परिहार यांनी केले. (प्रतिनिधी)