हिंगण्याजवळ तिहेरी हत्याकांड
By Admin | Updated: November 18, 2015 02:59 IST2015-11-18T02:59:53+5:302015-11-18T02:59:53+5:30
पानटपरी लावण्याच्या वादातून एका अट्टल गुन्हेगाराने धारदार कोयत्याचे वार करून बाजूचा पानटपरीचालक आणि त्याच्या मदतीला आलेल्या दोघांची निर्घृण हत्या केली.

हिंगण्याजवळ तिहेरी हत्याकांड
हिंगणा : पानटपरी लावण्याच्या वादातून एका अट्टल गुन्हेगाराने धारदार कोयत्याचे वार करून बाजूचा पानटपरीचालक आणि त्याच्या मदतीला आलेल्या दोघांची निर्घृण हत्या केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव(वागदरा)जवळच्या वृंदावन सिटी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास हे थरारक तिहेरी हत्याकांड घडले. यामुळे अवघ्या पंचक्रोशीत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. राजू शन्नू बिरहा (४५, रा. गुमगाव, ता. हिंगणा) असे हे हत्याकांड घडविणाऱ्या आरोपीचे तर सुनील हेमराज कोटांगळे (३२, रा. घोटी-डोंगरगाव, ता. हिंगणा), कैलास नारायण बहादुरे (३२, रा. घोटी-डोंगरगाव) आणि आशिष ऊर्फ गोलू लहुभान गायकवाड (२७, रा. डोंगरगाव, ता. हिंगणा) अशी मृतांची नावे आहेत.
वृंदावन सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ राजू बिरहाची पानटपरी आहे. बाजूलाच सुनील कोटांगळे यानेही पानटपरी सुरू करण्याचे प्रयत्न चालविले होते. त्यामुळे बिरहा संतापला होता. त्याचमुळे राजू आणि सुनीलमध्ये पानटपरी सुरू करण्याच्या वादातून मंगळवारी सकाळी भांडण सुरू झाले. कुणीही नमते घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे वाद विकोपाला गेला. प्रकरण हाणामारीवर गेले. मुळात गुन्हेगारीवृत्तीचा राजू बिरहा आपल्या टपरीत धारदार शस्त्र लपवून ठेवत होता. त्याने आपल्या पानटपरीत दडवलेला कोयता (सत्तूर) बाहेर काढून सुनीलच्या छाती आणि पोटावर सपासप घाव घातले. ते पाहून बाजूला उभे असलेले आशिष गायकवाड आणि कैलास बहादुरे मध्यस्थीसाठी धावले.
अवघे गावच सुन्न
नागपूर : आरोपी राजू बिरहा हा खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यावर नागपूर शहर तसेच हिंगणा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने गेल्यावर्षी अशाच प्रकारे एकावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी हिंगणा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०७ तसेच अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याची गुंडगिरी सुरूच होती. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे तो आपल्या पानटपरीतच घातक शस्त्र ठेवत होता.
त्याच शस्त्राने त्याने तीन जणांना संपवले. यापैकी सुनील कोटांगळेला दोन मुले आहे. त्याच्या हत्येने त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. बहादुरेची पत्नी गर्भवती असून, ती बाळंतपणासाठी माहेरी गेल्याची माहिती आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे अवघे गावच सुन्न पडले असून, पंचक्रोशीत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
ती बचावली
तिघांची हत्या केल्यानंतर आरोपीची नजर सुनील कोटांगळे याची पत्नी घुमेश्वर ऊर्फ बबली कोटांगळे हिच्यावर पडली. राजूने तिच्याकडेही धाव घेतली. ते पाहून बबलीने घटनास्थळाहून पळ काढला. बाजूच्या शेतातील उंच गवतात लपून बसल्याने ती बचावली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आरोपी घटनास्थळाहून पसार झाला होता. दुपारी ३ च्या सुमारास त्याला गुमगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२, ३०४, ११४ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास ठाणेदार वांदिले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके व उपनिरीक्षक सुरेश माटे करीत आहेत.
राक्षसीवृत्ती
राजूने त्यांच्यावरही हल्ला चढविला. गायकवाडसुद्धा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून जखमी अवस्थेतील बहादुरे जीवाच्या आकांताने गर्दीकडे पळू लागला. गर्दीतील नागरिकांना त्याने मदतीसाठी याचना केली. मात्र, भलामोठा धारदार रक्ताने माखलेला कोयता हातात धरून शिव्या घालत आलेल्या राजूचे राक्षसी रूप पाहून गर्दीतील साऱ्यांच्याच जीवाचा थरकाप उडाला होता. जो तो जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. ते पाहून आरोपी राजूने बहादूरेला पकडले. त्याला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर बसून कोयत्याचे सपासप घाव घातले. बहादुरे निपचित पडला तरी आरोपी त्याच्यावर घाव घालतच होता.