‘डब्बा’ सीबीआयकडे सोपवा
By Admin | Updated: August 26, 2016 02:49 IST2016-08-26T02:49:29+5:302016-08-26T02:49:29+5:30
बहुचर्चित डब्बा प्रकरणाची व्याप्ती देश-विदेशात आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या मर्यादा येऊ शकतात.

‘डब्बा’ सीबीआयकडे सोपवा
पोलिस करणार सरकारकडे मागणी : पोलीस आयुक्तांचे संकेत
नागपूर : बहुचर्चित डब्बा प्रकरणाची व्याप्ती देश-विदेशात आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या मर्यादा येऊ शकतात. ते लक्षात घेता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, असा मागणी वजा अहवाल शहर पोलीस राज्य शासनाकडे पाठविणार आहे. शहराचे मावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी चर्चा करताना तसे संकेत दिले. यादव यांची मुंबईला बदली झाली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था ही जबाबदारी ते सांभाळणार आहेत. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघ तसेच टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीने ‘पत्रकारांशी वार्तालाप’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात यादव यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
बहुचर्चित डब्बा प्रकरणाच्या अनुषंगाने पत्रकारांनी आयुक्त यादव यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रकरणात अनेक नेते, पांढरपेशे गुंतले असल्याची चर्चा होती. पोलीस अधिकारी आॅफ द रेकॉर्ड त्याला दुजोराही देत होते. मात्र तीन महिने होऊनही कुणाला अटक नाही, त्यांची नावेही उघड झाली नाही, असा प्रश्न केला असता काही प्रश्नांची उत्तरे गोपनीयतेमुळे देता येत नाही, मात्र, लवकरच यातील अनेक बाबींचा खुलासा होईल, असेही त्यांनी सांगितले. कित्येक लाख कोटींची सट्टेबाजी करणाऱ्या डब्बा व्यापारांमुळे अनेक जण बर्बाद झाले आहेत. डब्बा व्यापाऱ्यांचे नेटवर्क विविध राज्यांसह विदेशातही आहे. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी मर्यादा येतात. म्हणून हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, असा निष्कर्ष शहर पोलिसांनी काढला आहे. त्यासंबंधाने आवश्यक अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अहवालावर काय निर्णय घ्यावा, ते शासन ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांना ‘रिअॅक्टिव्ह’ केले : पोलीस आयुक्त
नागपूर : शहरातील आपल्या १७ महिन्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतानाच त्यांनी पोलिसांना ‘रिअॅक्टिव्ह’ (घटना घडल्यानंतर काही करण्यापूर्वी घटना घडूच नये यासाठी प्रयत्न) केले, असे शहराचे मावळते पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यादव म्हणाले, २२ प्रकरणात मोक्काची कारवाई करून गुन्हेगारी ठेचून काढण्याचे प्रयत्न केले. रात्रंदिवसाची गस्त प्रभावी केली. बीट मार्शल, दर महिन्याला क्राईम मिटींगच्या माध्यमातून ठाणेदारांना सतत सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला. महिला आणि मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्याचे प्रयत्न केले. नागरिकांच्या हक्काच्या पार्किंगवर अतिक्रमण करण्यात येते, त्यासंदर्भात महापालिकडे वारंवार चर्चा करण्यात आली. मात्र, संबंधित प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुचाकी उचलून नेण्याच्या वाहतूक पोलिसांच्या तक्रारी वारंवार झाल्याचेही त्यांनी मान्य केले. अनेक प्रकरणात दलालांशिवाय कामच होत नव्हते. तक्रारकर्ते ठाण्यात जाण्याऐवजी दलालांकडे जायचे आणि दलाल त्यांना घेऊन ठाण्यात जायचे. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर दलालांना ठाण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत् केले. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारावर कारवाई होईल, त्याची दक्षता घेतली. त्यातून नागरिकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झालो. शहरातील वाहतूक आणि पार्र्किंग विषयाशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे देताना राज्यात सर्वाधिक ड्रंक न ड्राईव्हच्या कारवाई नागपुरात केल्याचेही त्यांनी सांगितले.
काही प्रकरणात राजकीय दडपण आल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, कोणतेही दडपण आले नाही अन् कुणी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या दडपणात येण्याचा प्रश्न नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण काही टार्गेट ठरवून आलो नव्हतो. थोडे फार इकडे तिकडे झालेही असेल. मात्र, आपल्या कार्यकाळात झालेल्या कामगिरीवर आपण समाधानी आहोत. नवीन जबाबदारीला न्याय देण्याचाही आपण पूर्ण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. नागपूर हे एक सुंदर शहर आहे. येथील नागरिकही सकारात्मक विचार करणारे आहे. येथील पत्रकारांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केले. ते आपण कधीच विसरू शकणार नाही, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली. (प्रतिनिधी)