पाच महिन्यांत १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:45+5:302021-02-05T04:59:45+5:30
नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच ...

पाच महिन्यांत १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वे गाड्या
नागपूर : इटारसी-बल्लारशाह सेक्शनची क्षमता वाढविण्यात येत आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांची परवानगी मिळताच या सेक्शनमध्ये आगामी पाच महिन्यांत रेल्वे गाड्या प्रतितास १३० किलोमीटर वेगाने चालविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी शुक्रवारी नागपूर विभागाचा पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला. ते म्हणाले, इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये १३० किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या चालविण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्यानंतर नागपूर-वर्धा, नागपूर-बल्लारशाह सेक्शनमध्येही चाचणी घेण्यात येणार आहे. आरडीएसओच्या (रिसर्च डेव्हलपमेंट अॅड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) वतीने चाचणी घेण्यात येत आहे. आरडीएसओ आपला अहवाल देईल. अहवालात काही सुधारणा सुचविल्यास संबंधित कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी यांना इटारसी ते बल्लारशाह ट्रायल घेण्यासाठी अर्ज करण्यात येईल. सर्व काही सुरळीत पार पडल्यास इटारसी-बल्लारशाह सेक्शनमध्ये पाच महिन्यांत रेल्वे गाड्या १३० किलोमीटर वेगाने धावू शकतील, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुविधेसाठी समर्पित भावनेने कार्य केले. विशेष पार्सल रेल्वेगाड्या चालवून १.१४ लाख टन औषधांसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. ६०० श्रमिक स्पेशल गाड्या चालवून श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आले. लॉकडाऊनमध्ये ६८ किलोमीटर रेल्वे रुळाचे दुहेरीकरण करण्यात आले. २७५ किलोमीटर रेल्वे लाइनचे विद्युतीकरण करण्यात आले. कोरोनाच्या काळात मालगाड्यांचा वेग २४ किलोमीटरवरून ४२ किलोमीटर प्रतितास करण्यात आला. रेल्वेस्थानकावर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. बल्लारशाह, चंद्रपूर, माजरी, वरोरा येथील स्थानकांची पाहणी केली असता तेथील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. नागपूर विभागात प्रवाशांना तसेच दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
..........
थर्ड, फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर
नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती महाव्यवस्थापकांंनी दिली. सिंधी ते बुटीबोरीदरम्यान २० किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे. उर्वरित कामासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच थर्ड आणि फोर्थ लाइनचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
..........