रेल्वेगाड्या ‘फुल्ल’
By Admin | Updated: April 28, 2016 02:54 IST2016-04-28T02:54:35+5:302016-04-28T02:54:35+5:30
उन्हाचा पारा वाढलेला असताना रेल्वेगाड्यात पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

रेल्वेगाड्या ‘फुल्ल’
प्रवाशांची गैरसोय : मे महिन्यात गंभीर स्थिती
नागपूर : उन्हाचा पारा वाढलेला असताना रेल्वेगाड्यात पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यामुळे आरक्षणाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले असून, रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष रेल्वेगाड्यात तात्काळचे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. मे महिन्यात ही स्थिती आणखीनच बिकट होणार असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
रेल्वेगाड्यात आरक्षणाचे तिकीट मिळत नसल्यामुळे अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करण्याची पाळी येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून दिवसाकाठी १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट तर मिळत आहे, परंतु भलीमोठी प्रतीक्षायादी असल्यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा येत आहे. नागपुरातून दिल्ली, मुंबई, हावडा, चेन्नई, पाटणा, जयपूर, लखनौ, बंगळुरू, इंदोर आदी शहरात जाणाऱ्या गाड्यात हीच स्थिती आहे. काही एसी रेल्वेगाड्यात तर ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. या गाड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे या गाड्यांची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रेल्वेगाड्यातील गर्दी कायम राहणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन काही विशेष रेल्वेगाड्या चालवीत आहे. यात प्रवाशांना काही टक्के दिलासा मिळू शकतो. प्रवासी तात्काळचे तिकीट खरेदी करून आपला प्रवास सुखाचा करू शकतात. दरवर्षी उन्हाळ्यात आणि दिवाळीत हीच स्थिती निर्माण होत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)
दलालांचा फायदा
प्रवाशांना आरक्षणाचे कन्फर्म तिकीट मिळेनासे झाले असताना, दलाल याचा फायदा घेऊन प्रवाशांना मोठी रक्कम घेऊन तिकीट उपलब्ध करून देत आहेत. आयआरसीटीसीचे अकाऊंट तयार करून नागपुरातील काही दलाल प्रवाशांना अधिक रक्कम घेऊन तिकीट देत आहेत. रेल्वे सुरक्षा दल अशा दलालांवर नजर रोखून आहे. दलाल आणि वाणिज्य विभागाचे कर्मचारीही सतर्कता विभाग आणि सीबीआयच्या नजरेखाली आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने नुकतेच टेकडी गणेश मंदिर येथील उड्डाणपुलाखालील एका ट्रॅव्हल्स प्रतिष्ठानच्या दलालास रंगेहाथ पकडले होते.