व्यापारी त्रस्त, मात्र दहशतीत
By Admin | Updated: November 19, 2016 02:36 IST2016-11-19T02:36:55+5:302016-11-19T02:36:55+5:30
केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

व्यापारी त्रस्त, मात्र दहशतीत
सरकारच्या विरोधात चुप्पी : स्थिती पूर्ववत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार
नागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. छोट्या नोटा चलनात नाहीत. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली असून ते केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत.
सर्वच बाजारात व्यवसाय ३० टक्क्यांपर्यंत घसरला असून पुरवठ्याअभावी वस्तूंचे भाव वधारले आहेत. व्याजाने घेतलेल्या पैसा परतीची व्यावसायिकांना चिंता आहे.
दुकानदारांनी माल खरेदी केला आहे, पण विक्री नसल्यामुळे तो पडून आहे. व्यवसायाची साखळी खंडित झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त असून चक्रव्यूहात सापडला आहे. विविध बाजारपेठांमध्ये व्यापारी त्रस्त आणि दहशतीत आहे. छोट्या नोटा चलनात आल्यानंतरही बाजारातील मंदी दूर होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. किराणा, खाद्यतेल, धान्य बाजारातील व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी ‘टेलर मशीन’चा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया विविध बाजारपेठांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नवीन खरेदी बंद
नवीन नोटा चलनात अजूनही न आल्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. दुकानदारांकडे माल पडून आहे. नवीन खरेदी बंद आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथील कृषी बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांनी रोखीची मागणी केल्याने कृषी मालाची विक्री बंद आहे. कामगार आणि मजुरांना काम नाही. सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. जुन्या व्यापाऱ्यांनी रोख आणि धनादेशाने व्यवहार केला आहे. पण आता नवीन पिढीने डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी ‘टेलर मशीन’ खरेदीसाठी बँकेकडे धाव घेतली आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा मसाले बाजारातील व्यावसायिक चंदन गोस्वामी यांनी व्यक्त केली.
खाद्यतेल बाजारात मंदी
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे इतवारीतील खाद्यतेल बाजारपेठेत मंदी आहे. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. लग्नाचा हंगाम आहे, पण विक्री अत्यल्प आहे. कोणत्याही दुकानदारांची सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. शिवाय आयकर खात्याची भीती आहे. नागरिक त्रस्त आहेत, पण भविष्य चांगले आहे. ८० टक्के व्यवसाय रोखीने होतो. पण आता नोट मोजण्याची आणि ‘टेलर मशीन’ लावण्याची गरज पडली आहे. पुढे या मशीनद्वारे कॅशलेस व्यवहार होणार आहे. त्यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल, अशी प्रतिक्रिया इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी दिली.