आज फिर आँख मे नमी सी है...!
By Admin | Updated: September 5, 2014 01:13 IST2014-09-05T01:13:28+5:302014-09-05T01:13:28+5:30
युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली.

आज फिर आँख मे नमी सी है...!
युगच्या मृत्यूची हळहळ : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
नागपूर : युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. चांडक कुटुंबीयांच्यावतीने युगच्या निधनाबद्दल (उठावना) श्रद्धांजली सभेचे आयोजन लकडगंज परिसरातील टिम्बर भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी चांडक यांच्या नातेवाईकांसह संवेदनशील नागपूरकर नागरिकही मोठ्या संख्येने युगला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले.
याप्रसंगी डॉ. मुकेश चांडक, युगची आई, रमनलाल चांडक आदी कुटुंबीयांचे उपस्थितांनी सांत्वन केले. युगच्या हसऱ्या, प्रसन्न छायाचित्राकडे पाहून अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करताना दु:ख व्यक्त केले. पण नातेवाईक आणि नागपूरकर नागरिकांनी स्वत:च्या भावनेला आवर घालत चांडक कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. साधारणत: अशा आयोजनात स्वाभाविकपणे नातेवाईकांचा सहभाग असतो. पण या घटनेने हळहळलेले नागपूरकर युगला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाले होते.
अनेकांनी केले चांडक यांचे सांत्वन
जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. पण आता नाईलाज झाला आहे. युगच्या हत्येने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पण आज चांडक परिवाराच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी पुन्हा जगण्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे सांत्वन केले. अनेकांनी डॉ. मुकेश यांना आलिंगन देऊन त्यांच्या वेदनेत आपण सहभागी असल्याचा धीर त्यांना दिला. युगची आई अद्याप या धक्क्यातून सावरली नाही. त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू होते. महिलांनी त्यांना धीर देत हे दु:ख सोसण्याचे बळ त्यांना मिळावे, अशी प्रार्थना केली.
मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेत
प्रत्येकाच्या कुटुंबात लहान मुले असतात. प्रत्येक बाब मुलांना समजावून सांगता येत नाही. ती निरागस असतात. स्वाभाविकपणे ओळखीच्या व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसतो. पण आता ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याबद्दल पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. याबाबत पालकांमध्ये चर्चा होती. ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, असे बंधन मुलांवर टाकणे गैर आहे. किती बाबींपासून मुलांचे जगणे हिरावून घ्यायचे, हा प्रश्न यावेळी चर्चेला होता. मुले सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.