पाणवठय़ांजवळ मचाणी : कर्मचार्यांसह एनजीओ करणार निरीक्षण नागपूर : वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह ताडोबा-अंधारी, नागझिरा, न्यू नागझिरा, कोका, नवेगाव नॅशनल पार्क, नवेगाव, मेळघाट, मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्हांडला, टिपेश्वर, बोर व न्यू बोर अभयारण्यात तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जंगलातील पाणवठय़ाशेजारी मचाण तयार करण्यात आल्या आहे. १४ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानंतर रात्रभर जंगलातील मचाणीवर बसून वाघासह विविध वन्यजीवांची प्रगणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात वन्यजीवप्रेमींना प्रत्येक सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार वन्यजीव विभागाकडे आतापर्यंत सुमारे १५0 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष प्रगणनेसाठी वन विभागाने एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार या प्रगणनेत सहभागी होणार्यांना त्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागेल. वन विभागाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मचाणीवरील वन्यजीवप्रेमींसोबत एक वन विभागाचा प्रतिनिधी राहणार आहे. शिवाय मचाणवर बसल्यानंतर कुणालाही एकदुसर्यांशी बोलता येणार नाही. तसेच रात्रीला सर्च लाईट, पॉलिथीन वा बॅग सोबत बाळगता येणार नाही. सोबतच मोबाईलमधील कॅमेर्याचा फ्लॅशचा उपयोग करू नये. अशाही सूचना देण्यात आल्या आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व न्यू बोर अभयारण्य १२५ वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. गत सात वर्षांपासून काही ना काही कारणामुळे बोर अभयारण्यातील प्राणी गणना करणे शक्य झाले नाही. २00७ मध्ये अधिकृत प्राणी गणना यशस्वीरित्या करण्यात आली होती. तेव्हापासून अनेकदा प्रयत्न करण्यात आले; पण यशस्वी प्राणिगणना शक्य झाली नाही. यासाठी जुन्या बोरमध्ये २५ तर न्यू बोर अभयारण्यात २४ पाणवठय़ावर तेवढय़ाच मचाणी उभारण्यात आल्या आहेत. ही प्राणिगणना मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) एन.एस. रेड्डी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक उत्तम सावंत, बोरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र गायनेर, न्यू बोरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी रूपाली भिंगारे (सावंत) यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. नागझिरा, न्यू नागझिरा, कोका, नवेगाव ही अभयारण्य तसेच नवेगाव नॅशनल पार्क येथे २00 मचाणी बांधण्यात आल्या असून एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्या आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी प्रगणनेसाठी एकूण १0८ मचाणी उभारण्यात आल्या आहेत. ज्या मचानी मोठय़ा असतील, तिथे दोनहून अधिक वन्यप्रेमींची व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यप्राणी प्रगणनेसाठी एकूण २५0 जणांची नोंदणी झालेली आहे. तसेच १0८ कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. ताडोबा, मोहर्ली व कोळसा या तीन रेंजमधून कर्मचारी व वन्यप्रेमी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
व्याघ्र प्रकल्प-अभयारण्यांत प्राणिगणना आज
By admin | Updated: May 14, 2014 00:10 IST