ठगबाज जोशीच्या घरावर पीडितांची होती पाळत
By Admin | Updated: August 9, 2014 02:32 IST2014-08-09T02:32:23+5:302014-08-09T02:32:23+5:30
दामदुप्पट पैशाचे आमिष देऊन हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसवणाऱ्या ‘रविराज’च्या राजेश जोशी या ठगबाजाच्या घरावर पीडित गुंतवणूकदारांनी अनेक दिवस पाळत ठेवली होती.

ठगबाज जोशीच्या घरावर पीडितांची होती पाळत
आनंद डेकाटे नागपूर
दामदुप्पट पैशाचे आमिष देऊन हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसवणाऱ्या ‘रविराज’च्या राजेश जोशी या ठगबाजाच्या घरावर पीडित गुंतवणूकदारांनी अनेक दिवस पाळत ठेवली होती. कसेही करून त्याच्याकडून पैसै परत घ्यायचे आणि वेळ पडलीच तर त्याला झोडपायलाही मागेपुढे पाहायचे नाही असा पीडितांचा प्रयत्न होता. परंतु ठगबाज जोशी हा गुंतवणूकदारांच्या हातावर तुरी देऊन कुटुंबासह पळून जाण्यात यशस्वी ठरला. अखेर बुधवारी तो पोलिसांच्याच हाती लागला.
प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश जोशी याच्या विवेकानंदनगर येथील घर व कार्यालयाचा फेरफटका मारला असता उपरोक्त माहिती उघडकीस आली. विवेकानंदनगर येथे राजेशचा कौस्तुभ नावाचा दोन माळ्यांचा भव्य बंगला आहे. या बंगल्याच्या वरच्या माळ्यावर त्याने रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचे कार्यालय थाटले आहे. सध्या हा संपूर्ण बंगला पोलिसांनी सील केला आहे. गेटवर व दारावर पोलिसांनी मोठे कुलूप लावून त्याला सील ठोकले आहे.
जोशी यांच्या शेजाऱ्यांनाही त्याच्याबाबत मोठे आश्चर्य वाटते. जोशी याच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, राजेश जोशीला आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. तो काही वर्षांपूर्वीपर्यंत अगदी सर्वसामान्यांपैकी होता. परंतु गेल्या तीन-चार वर्षातच त्याचे राहणीमान अचानक बदलले. तो महागड्या गाड्यांनी फिरू लागला. त्याची श्रीमंती ही अगदी नजरेत भरणारी होती. तो नेहमी महागड्या गाड्या बदलवित असे. अनेक गाड्या तर त्याने काही लोकांना गिफ्ट सुद्धा केल्या होत्या.
त्याच्या राहणीमानातील हा फरक त्याने रविराज कंपनी स्थापन केल्यापासून झाला होता. परिसरातील लोकांना सुरुवातीला त्याच्या कर्तृत्वाबद्दल आदर वाटायचा परंतु हळुहळू लोकांच्या तक्रारी वाढल्या आणि त्याच्याबाबत संशय येऊ लागला. लोक त्याच्या घरी गुंतवलेले पैसे परत मागण्यासाठी चकरा मारू लागले. तो प्रत्येकाला पुढच्या तारखेचे आश्वासन देऊन परत पाठवू लागला. जून महिन्यात एके दिवशी रात्रीच्या सुमारास तो कुटुंबासह फरार झाला. तेव्हापासून त्याला विवेकानंदनगरातील लोकांनी पाहिले नाही. परंतु पीडित गुंतवणूकदार मात्र त्याच्या शोधात होते. लोक टोळक्यांनी त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवून राहायचे. त्यांच्या हातात काठ्याही राहायच्या.
बंगल्यापासून थोडे दूर गल्लीत तासन्तास थांबून वाट पाहायचे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्याची वाट पाहात बसायचे.
तब्बल महिनाभर हा प्रकार चालला. परंतु तो काही नंतर आला नाही. त्यामुळे त्यांनीही नाद सोडला. शेवटी बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याच हाती तो गवसला.
दूध विक्रेत्याने काच फोडून व्यक्त केला राग
राजेश जोशी याने अनेकांना गुंतवणुकीच्या नावावर फसविले. त्याचा राग लोकांच्या मनात आहेच. परंतु जोशी याच्या घरी दररोज दूध पोहचवणाऱ्या एका मुलाचे पैसेही त्याने पचविले. पळून जाण्यापूर्वी त्याने त्याचे पैसे परत दिले नाही. त्यामुळे गरीब दूध विक्रेत्या मुलाने रागाच्या भरात त्याच्या बंगल्यावर दगड मारला. यात बंगल्याच्या वरच्या माळ्यावरील खिडकीचा काच फुटला.
महिनाभरापूर्वी झालेल्या चोरीचे गौडबंगाल
राजेश जोशी कुटुंबासह फरार झाल्यानंतर पीडित गुंतवणूकदारांनी महिनाभर त्याच्या घराच्या चकरा मारल्या. परंतु त्यानंतर त्यांनीही प्रयत्न सोडून दिले. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दरम्यान महिनाभरापूर्वी एके दिवशी जोशीच्या बंगल्यात चोर शिरले. एका तरुणाने चोराला पाहिले सुद्धा परंतु आता बंगल्यात काय शिल्लक असेल म्हणून त्याने लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस बंगल्यात आले असता त्याने पोलिसांना घडलेली माहिती सांगितली. पोलिसांनी घराच्या आत जाऊन पाहिले तेव्हा सामान सर्वत्र अस्ताव्यस्त पसरले होते. ही चोरी नेमकी कशासाठी झाली. काही महत्त्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात तर आले नाही ना? हा प्रश्न निर्माण झाला आहे.