दोन दिवसांत तीन घटना : मागील महिन्यात झाला होता मुलींचा विवाहवरोरा (जि. चंद्रपूर)/धारणी (जि. अमरावती) : वरोरा तालुक्यातील दोन शेतकर्यांनी गळफास लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रबी हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्याने शेतकर्यांची स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. जामणी येथील अंनत बळीराम जेऊरकर (४५) तसेच ताडगव्हाण येथील विजय अण्णाजी बदखल (४५) असे मृत शेतकर्यांचे नाव आहे. अनंत जेऊरकर या शेतकर्याच्या आईच्या नावावर शेती आहे. या शेतीमध्ये कुटुंबीयाचे भागत नसल्याने अनंत दुसर्या शेतकर्याकडे चाखरी करीत होता. त्याला शासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले. घरकुलाचे अर्धे बांधकाम झाले आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने पुढील बांधकाम कसे करावे, या विवंचनेत तो होता. त्याच्यावर खासगी कर्जही होते. यातच त्याने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुसर्या घटनेत ताडगव्हाण येथे घडली. विजय अण्णाजी बदखल (४५) या शेतकर्याकडे पाच एकर शेती आहे. मागील महिन्यातच दोन मुलींचा विवाह केला. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांंपासून अतवृष्टी व सततची नापिकी यामुळे विवंचनेत होता. यात गुरुवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकर्याने मागील महिन्यातच आपल्या दोन मुलींचा विवाह केला, हे विशेष.धारणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेच्या अडीच लाखाच्या पीक कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने हरदोली येथील शेतकरी रामनिवास गेंदालाल जैस्वाल (४0) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. गतवर्षी संततधार पावसामुळे पिके नष्ट झाली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जैस्वाल यांना पडला होता. वैफल्यग्रस्त स्थितीत विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. (तालुका प्रतिनिधी)
खरिपाच्या तोंडावर तीन शेतकर्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST