हजारो विद्यार्थ्यांनी घेतला बोर्डाच्या परीक्षेतून ड्रॉप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:11+5:302021-03-04T04:13:11+5:30
मंगेश व्यवहारे नागपूर : कोरोनाचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नागपूर बोर्डाकडे एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी झालेल्या ...

हजारो विद्यार्थ्यांनी घेतला बोर्डाच्या परीक्षेतून ड्रॉप !
मंगेश व्यवहारे
नागपूर : कोरोनाचा फटका दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नागपूर बोर्डाकडे एप्रिल २०२१ च्या परीक्षेसाठी झालेल्या नोंदणीवरून लक्षात येते की, हजारो विद्यार्थ्यांनी यावर्षी ड्रॉप घेण्याची मानसिकता बनविली आहे. गेल्यावर्षीची आणि यावर्षीच्या परीक्षार्थींच्या संख्येत मोठी तफावत आहे.
दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या परीक्षांमध्ये चांगला स्कोअर केल्यानंतर ते आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतात. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायकच ठरले आहे. शाळा, शिकवणी वर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. ग्रामीण भागात तर ऑक्टोबरपर्यंत कुठल्याच हालचाली नव्हत्या. ऑक्टोबरनंतर ग्रामीणमध्ये काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. पण तांत्रिक अडचणीमुळे अध्यापन आणि अध्ययन शक्य झाले नाही. १४ डिसेंबरपासून ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र ५० टक्के विद्यार्थी शाळेत आलेले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. पण ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही. महापालिकेच्या हद्दीतील काही शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. पण २० ते २५ टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यातही फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्याने वर्धा व नागपूर जिल्ह्यातील शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नाही आणि शिल्लक असलेल्या वेळेत तयारी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदा परीक्षेतून ड्रॉप घेऊन, पुढच्या वर्षी परीक्षेची तयारी करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मानसिकता झाली आहे. नाही तरी वर्ष गेलेलेच आहे, उरलेल्या वेळेत विद्यार्थी काय साध्य करतील, अशी पालकांचीही भूमिका आहे.
- दृष्टिक्षेपात
मार्च २०२० मध्ये दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेले विद्यार्थी १६२५५४
एप्रिल २०२१ च्या दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी १५५७१०
मार्च २०२० मध्ये बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेले विद्यार्थी १६८५०८
एप्रिल २०२१ च्या बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी १४६९९१
- बाेर्डाकडे वाढले निवेदन
राज्य शिक्षण मंडळाने २३ एप्रिलपासून बारावीची व २८ एप्रिलपासून दहावीच्या परीक्षेचे नियोजन केले आहे. पण शिक्षकांच्या संघटनांनी परीक्षा सकाळच्या वेळेत घ्यावी, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे ५० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी, कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता शाळा तिथे परीक्षेचे केंद्र ठेवावे, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात निवेदनातून मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्या राज्य मंडळांकडे पाठविण्यात आल्या आहे. मंडळाने परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक घोषित केले आहे. त्यात काही बदल नाही.
माधुरी सावरकर, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ नागपूर