‘ते’ एकसाथ निघाले अंतिम प्रवासाला
By Admin | Updated: March 24, 2015 02:12 IST2015-03-24T02:12:14+5:302015-03-24T02:12:14+5:30
पिकनिकच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या आणि नंतर एकसाथच अंतिम प्रवासाला निघालेल्या पाच

‘ते’ एकसाथ निघाले अंतिम प्रवासाला
नरेश डोंगरे/ मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर
पिकनिकच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या आणि नंतर एकसाथच अंतिम प्रवासाला निघालेल्या पाच तरुणांची अंत्ययात्रा सक्करदरा, हुडकेश्वर, मानेवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांच्या काळजाचे पाणी करणारी ठरली. मृतांच्या आप्तांचा, मित्रांचा आक्रोश अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांनाच नव्हे, तर रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांनाही गलबलून टाकणारा होता. अत्यंत शोकाकूल वातावरणात सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हर्षल प्रकाश आदमने, चेतन प्रकाश आदमने, गोरक्षण बापू थोटे, राहुल वालोदे आणि राम शिवरकर या पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मानेवाडा घाटावर जमलेल्या अनेकांना हुंदके आवरेनासे झाले होते.
आशीर्वादनगरातील हर्षल प्रकाश आदमने (वय १८), चेतन प्रकाश आदमने (वय २०), गोवर्धन बापू थोटे (वय १८), राहुल वालोदे (वय २३), राम शिवरकर (वय २४), मकसूद शेख अब्दुल सय्यद (वय २७) आणि सर्फराज शेख (वय २१) तसेच प्रकाश हरिकिशन मोहनिया, अजहर शेख, रियाज शेख आणि मोहम्मद जहीर हे ११ तरुण खाण्यापिण्याच्या चीजवस्तू घेऊन रविवारी सकाळी पिकनिकसाठी निघाले. नागपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावर आडवळणावर असलेल्या मंगरुळ शिवारातील तलावावर गेले होते.
अवघा परिसरच हादरला
बचावलेल्यांनी फोन करून आपल्या मित्रांना या घटनेची माहिती कळविली. त्यांनी नातेवाईकांना सांगितले. एकाच परिसरातील रहिवासी असल्यामुळे आशीर्वादनगरातील बहुतांश रहिवाशांना या दुर्घटनेची माहिती कळाली अन् अवघा परिसरच हादरला. अनेकांनी तलावाकडे धाव घेतली. माहिती कळाल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिक आणि कुही, बुटीबोरीसह नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिकारी आपापल्या ताफ्यासह धावले. त्यामुळे तलावावर मोठी गर्दी जमली. पट्टीचे पोहणारे पाण्यात उतरून तरुणांना शोधण्याचे प्रयत्न करू लागले. मात्र, तलावात मोठा गाळ असल्यामुळे त्यांना यश आले नाही.
असा झाला घात...
तलावाच्या काठावर खाणेपिणे झाल्यानंतर दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास काही जणांनी घराकडे निघण्याची तयारी केली. त्यामुळे अजहर, रियाज आणि जहिर हे तीन जण आवराआवर करू लागले तर, तलावाच्या काठावर डोंगा असल्याचे पाहून काही जण डोंग्याजवळ जाऊन सेल्फी (फोटो) काढू लागले. ते पाहून एकापाठोपाठ आठ जण डोंग्याजवळ आले. डोंग्यात बसले अन् त्यांनी डोंग्याला पाण्यात नेले. याचवेळी काही जणांनी सेल्फी (फोटो) काढणे सुरू केले. सेल्फीच्या नादात सर्वच्या सर्व तरुण आरडाओरड करीत डोंग्याच्या एकाच बाजूला उभे झाले. डोंग्याला छिद्र होते. त्यामुळे तो पाण्यात उलटला. परिणामी डोंग्यातील तरुण पाण्यात बुडाले. प्रकाश मोहनियाला पोहता येत होते. त्यामुळे तो कसाबसा काठावर पोहोचला. तर हर्षल, त्याचा भाऊ चेतन, गोवर्धन, राहुल, राम, मकसूद आणि सर्फराज हे पाण्यात बुडू लागले.
‘त्यांचे’ विश्वच संपले
नागपूर : सुखस्वप्नाची रांगोळी सजवत असताना दु:खाची त्सुनामी यावी अन् क्षणात सारे नाहीसे व्हावे, तसाच काहीसा प्रकार मंगरुळ तलावावर घडलेल्या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आला. काळाने असा सूड उगविला की आदल्या दिवशी ज्याचा वाढदिवस साजरा केला त्याच्या काही तासानंतर त्याची अंत्ययात्रा काढण्याचे दुर्दैव आदमने दाम्पत्याच्या वाट्याला आले. ज्याची ‘बारात’ काढायची तयारी नातेवाईक करीत होते, त्या सर्फराजचा जनाजा काढण्याची दुर्दैवी वेळ त्याच्या नातेवाईकांवर आली.
आदमने कुटुंबीयांना चेतन आणि हर्षल ही दोनच मुले. चेतन केडीके कॉलेजचा विद्यार्थी तर, आयटीआय केल्यानंतर हर्षल महिंद्रामध्ये अॅप्रेंटीसशिप करू लागला. त्यामुळे आदमने कुटुंबीयांची ‘अच्छे दिन’ची उमेद जागली. शनिवारी चेतनचा वाढदिवस साजरा झाला. आईवडिलांनी, आप्तांनी, मित्रांनी त्याला ‘जियो हजारो साल’च्या शुभेच्छा दिल्या. रविवारी सकाळी चेतन आणि हर्षल दोघेही घराबाहेर पडले अन् जीवनाचे रहाटगाडगे चालविण्यासाठी आईवडीलही कामावर गेले. सायंकाळी कामावरून घरी परतण्यापूर्वीच आदमने दाम्पत्याचे काळीज छेदणारी वार्ता त्यांना कळाली. ती ऐकून आईने हंबरडाच फोडला. रविवारी पार्टी करण्यासाठी गेलेल्या चेतन आणि हर्षलचे कलेवर सोमवारी सकाळी घरी पोहचले. ते बघून आदमने दाम्पत्याचा आक्रोश अधिकच वाढला. त्यांचा दु:खावेग तेथे जमलेल्या साऱ्यांच्याच काळजाचे पाणी करणारा ठरला. त्यांची समजूत घालणाऱ्या महिला-पुरुषांना स्वत:लाच गहिवर रोखणे कठीण झाले.
बारात नही,
जनाजा निकला
मकसुदच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आलेले दु:खही शब्दातीत आहे. तो घरातील मोठा आधार होता. त्याचे लग्न जळविण्यासाठी नातेवाईक गुंतले होते. त्याच्या डोक्यावर सेहरा बांधून त्याची ‘बारात’ काढण्याचे स्वप्न मकसुदचे आईवडील रंगवत होते. मात्र, काळाने असा सूड उगवला की त्याच्यासाठी कफन घेऊन जनाजा काढण्याची दुर्दैवी वेळ मकसुदच्या नातेवाईकांवर आली. सारेच कसे काळीज पिळवटून टाकणारे घडले. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांचे जणू विश्वच संपले.
ये दोस्ती...
हम नही छोडेंगे...
मकसूद आणि सर्फराज जीवाभावाचे मित्र होते. ते बहुदा सोबतच दिसायचे. खाणे, घेणे, फिरणे सोबतच करायचे. एवढेच काय ते दोघेही ‘शिफ्ट‘मध्ये एकच आॅटो चालवायचे. कुठे जायचे असले तरी सोबतच जायचे. रविवारी पार्टीलासुद्धा ते सोबतच गेले. डोंगा उलटल्यानंतर त्यांनी एकमेकांना वाचविण्याचे प्रयत्न केले. जमणार नाही, असे लक्षात येताच त्यांनी एकमेकांना घट्ट पकडले अन् मृत्यूलाही सोबतच सामोरे गेले.