नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे
By Admin | Updated: May 15, 2014 02:38 IST2014-05-15T02:38:26+5:302014-05-15T02:38:26+5:30
नक्षलवादाचा बीमोड करायचा असेल तर सरकारने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले पाहिजे. ज्यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र बजेट असेल ..

नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे
नागपूर : नक्षलवादाचा बीमोड करायचा असेल तर सरकारने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले पाहिजे. ज्यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र बजेट असेल व या निधीतून तेथील नागरिकांसाठी रस्ते, रुग्णालये, वीज, पाणी, रोजगार व इतर साधनसुविधा उपलब्ध करून देता येतील, अशी मागणी मनसेचे विधानसभेतील गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी केली.
नांदगावकर यांनी बुधवारी गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस जवानांची नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पिटल येथे भेट घेतली. जखमी जवान हेमंत बनसोड यांच्या पत्नी व भाऊ आणि पंकज सिडाम यांच्या आई-वडिलांना भेटून धीर दिला. यावेळी मनसेतर्फे जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी नांदगावकर म्हणाले, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे राजीनामा मागून काहीही उपयोग होणार नाही. निदान त्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची माफी तरी मागावी. नक्षलग्रस्त भागात काम करणार्या पोलीस जवानांकडे बंदुकीशिवाय कुठलीही अत्याधुनिक शस्त्रे नाहीत, बुलेटप्रूफ ज्ॉकेट नाहीत, बुलेटप्रूफ वाहने नाहीत. अशात ते नक्षलवाद्यांशी सामना कसा करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नक्षली भागात काम करणार्या जवानांना फक्त २५00 रुपये कमांडो भत्ता मिळतो. नक्षल भागात कर्तव्य बजावणारे पोलीस जवान हे २२ ते ३0 वयोगटातील असतात. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जीवाची चिंता असते. मात्र, तरीही जवान निष्ठेने कर्तव्य बजावतात. या पोलिसांना ५0 हजार रुपयांहून अधिक पगार देण्याची मागणी त्यांनी केली. शहीद होणार्या जवानाच्या कुटुंबाला शहीद कुटुंबीयांचा दर्जा देऊन २५ लाखापर्यंत मदत करावी, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, पेन्शन योजना तसेच कुटुंबीयांना एक घर सरकारने द्यावे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी, गडचिरोली संपर्क अध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, मनीष देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)